नवी दिल्ली : परीक्षा नियोजनातील पारदर्शकतेसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात एनटीएने ६०० तज्ज्ञांना हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या तज्ज्ञांच्या जागेवर नव्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक सुरक्षा आणि संबंधित पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना आणि निर्देश दिले आहेत. आता चार स्तरिय व्यवस्थेतून प्रत्येक प्रश्नपत्रिकेची आणि उत्तरपत्रिकेची कसून तपासणी करण्याचीही व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी तपासणी करणाऱ्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एनटीएने परीक्षांच्या आयोजनासाठी सुरक्षा आणि पायाभूत सुविधा मजबूत करण्यावरही भर देण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय स्तरावर परीक्षांचे आयोजन करणाऱ्या एनटीएचा कारभार दिल्लीतील मिंटो मार्गावरील नव्या इमारतीतून हाताळला जाणार आहे. एनटीएशी संबंधित कामकाज जिथून चालणार आहे त्या सर्वच ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे. आवश्यक तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था केली जाणार आहे. एनटीएच्या कारभाराला सीआयएसएफच्या जवानांचे संरक्षण असेल.
शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी उच्च शिक्षण विभागाचे सचिव, एनटीएचे महासंचालक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, अलीकडील समस्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय चाचणी संस्थेने (एनटीए) उचललेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी आणि परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत एनटीएने परीक्षा व्यवस्थेतील सुधारणेसाठी आतापर्यंत घेतलेले निर्णय आणि लवकरच घेतले जाणार असलेले निर्णय यावर चर्चा झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रशासनाला कारभार सुधारण्यासाठी सूचना आणि निर्देश दिले.
सर्व परीक्षा प्रक्रियांचे सखोल ऑडिट करून केलेल्या सुधारणात्मक कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश एनटीएला देण्यात आले. नव्या परीक्षा नियमावलीचे काटेकोरपणे पालन सुनिश्चित करण्याचे निर्देशही शिक्षणमंत्री जोशी यांनी अधिकाऱ्यांना दिले.






