Wednesday, September 2, 2026

Chandrapur ashram school food poisoning : चंद्रपुरात भयंकर प्रकार! वरणाच्या पातेल्यात शिजली पाल; आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा!

Chandrapur ashram school food poisoning : चंद्रपुरात भयंकर प्रकार! वरणाच्या पातेल्यात शिजली पाल; आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा!

महाराष्ट्र शासनाने आश्रमशाळांमधील सुविधांबाबत मुंबई उच्च न्यायालयात सकारात्मक माहिती दिल्यानंतर लगेचच ही भीषण घटना समोर आली आहे. जिवती तालुक्यातील नगराळा येथील 'अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेत' (Amru Naik Secondary Ashram School) दुपारच्या जेवणातून तब्बल ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. आश्रमशाळांमधील समस्यांविरोधात सुरू असलेले १७ दिवसांचे उपोषण मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने नुकतेच सुटले होते. मात्र, त्यानंतर लगेच घडलेल्या या प्रकरणामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

ही घटना मंगळवारी दुपारच्या जेवणाच्या वेळी घडली. सकाळी स्वयंपाकघरात कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांसाठी वरण आणि भाजी शिजवण्याचे काम सुरू असताना एक जिवंत पाल नकळतपणे वरणाच्या मोठ्या भांड्यात पडली. दुपारी जेवणाची वेळ झाल्यावर मुलांनी पोळी आणि भाजी खाण्यास सुरुवात केली होती. त्याचवेळी वरण वाढणाऱ्या एका विद्यार्थ्याला पातेल्यामध्ये शिजलेल्या पालीचे तुकडे तरंगताना दिसले. हे दृश्य पाहताच जेवण त्वरित थांबवण्यात आले, परंतु तोपर्यंत अनेक मुलांच्या पोटात दूषित अन्न गेले होते.

दूषित अन्न पोटात गेल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना त्रास होण्यास सुरुवात झाली. मुलांना तीव्र मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येऊ लागल्याने शाळेत एकच गोंधळ उडाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळा प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका बोलावून बाधित मुलांना जिवती येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर काही मुलांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच शेजारच्या गडचिरोली जिल्ह्यात एका आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन निष्पाप विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता चंद्रपुरात अन्नातून विषबाधा झाल्याची बातमी पसरताच पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आपल्या मुलांच्या जिवाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पाहून, संतापलेल्या पालकांनी आश्रमशाळेत धाव घेत पाल्यांना सुरक्षितपणे घरी नेण्यास सुरुवात केली आहे. या दुर्घटनेनंतर शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधील स्वच्छता आणि अन्नाच्या दर्जावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. चंद्रपूरचे तत्कालीन पालकमंत्री आणि आदिवासी कल्याण मंत्री अशोक उईके यांच्यावरही या ढिसाळ व्यवस्थापनामुळे चौफेर टीका होत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना चंद्रपूरचे जिल्हा माहिती अधिकारी राजेश एनसरकार यांनी सांगितले की, ही संस्था आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असली तरी ती थेट आदिवासी विकास विभागांतर्गत नसून 'व्हीजेएनटी' (विमुक्त जाती व भटक्या जमाती) विभागाकडून अनुदानित तत्त्वावर चालवली जाते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >