Thursday, September 3, 2026

Krishna Janmashtami 2026 : बाळगोपाळाच्या पूजेचा 'हा' सर्वोत्तम मुहूर्त कमी लोकांना माहित; जाणून घ्या योग्य वेळ आणि पूजा पद्धत!

Krishna Janmashtami 2026 : बाळगोपाळाच्या पूजेचा 'हा' सर्वोत्तम मुहूर्त कमी लोकांना माहित; जाणून घ्या योग्य वेळ आणि पूजा पद्धत!

श्रावण आणि भाद्रपद महिन्यांचे आगमन म्हणजे भारतीय संस्कृतीत विविध धार्मिक सण-उत्सवांची पर्वणीच असते. या काळात आबालवृद्धांना वेध लागतात ते म्हणजे लाडक्या बाळगोपाळाच्या जन्मोत्सवाचे, म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमीचे. संपूर्ण देशात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जाणारा हा उत्सव २०२६ मध्ये शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री मथुरेच्या कारागृहात देवकी आणि वसुदेवाच्या पोटी भगवान श्रीकृष्णाचा अवतार झाला होता. अज्ञानाचा आणि अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करणाऱ्या या अवताराचा जन्म दिवस हा भाविकांसाठी अत्यंत पवित्र आणि आनंदाचा क्षण मानला जातो.

या वर्षी जन्माष्टमीच्या पूजेसाठी अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी असा मुहूर्त जुळून येत आहे. वैदिक पंचांगानुसार, अष्टमी तिथीची सुरुवात ४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २:२५ वाजता होईल आणि ती ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२:१३ वाजेपर्यंत राहील. यासोबतच ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२:२९ ते रात्री ११:०४ वाजेपर्यंत रोहिणी नक्षत्र असणार आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री १२ वाजता झाल्यामुळे, जन्मोत्सवाचा मुख्य पूजा मुहूर्त ४ सप्टेंबरच्या रात्री ११:५७ ते मध्यरात्री १२:४३ या ४६ मिनिटांच्या कालावधीत असेल. हा काळ बाळकृष्णाची स्थापना, अभिषेक, विशेष पूजा आणि आरतीसाठी सर्वोत्तम मानला जातो. जे भाविक जन्माष्टमीचा उपवास धरतात, त्यांनी ५ सप्टेंबर रोजी सकाळी ६:०१ नंतर पारण (उपवास सोडणे) करणे शास्त्रानुसार योग्य ठरेल.

कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपवास आणि पूजेला विशेष महत्त्व आहे. भाविक संपूर्ण दिवस उपवास ठेवून मध्यरात्रीच्या पूजेची तयारी करतात. पूजेच्या वेळी बाळगोपाळाच्या मूर्तीला सर्वप्रथम दुध, दही, तूप, मध आणि साखरेने बनवलेल्या पंचामृताने स्नान घातले जाते. त्यानंतर त्यांना नवीन रंगीबेरंगी वस्त्रे, बासरी, मोराचे पीस आणि तुळशीपत्र अर्पण करून सजवले जाते. श्रीकृष्णाला झोपाळ्यात बसवून प्रेमाने झोका दिला जातो आणि त्यांचा आवडता प्रसाद म्हणजेच लोणी-साखर (माखन-मिश्री), पंजिरी व खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. महाआरतीनंतर काही भाविक मध्यरात्रीच प्रसाद घेऊन उपवास सोडतात, तर काही जण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पारण करून उपवासाची सांगता करतात. भाविकांच्या श्रद्धेनुसार या शुभ मुहूर्तावर केलेली पूजा जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >