Thursday, September 3, 2026

Nashik : उष्णतेच्या तडाख्यापासून नाशिकला ‘कवच’! महापालिका-एनआरडीसी इंडियात पाच वर्षांचा करार

Nashik : उष्णतेच्या तडाख्यापासून नाशिकला ‘कवच’! महापालिका-एनआरडीसी इंडियात पाच वर्षांचा करार

Nashik : वाढत्या उष्णतेचा शहराच्या आरोग्य, उपजीविका आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने निर्णायक पाऊल उचलले आहे. उष्णता सहनशीलता आणि शाश्वत शीतकरणासाठी नाशिक महानगरपालिका व एनआरडीसी इंडिया यांच्यात बुधवारी राजीव गांधी भवन येथे पाच वर्षांचा सामंजस्य करार करण्यात आला. आयआयएम नागपूरच्या उत्कृष्टता केंद्राचे तांत्रिक सहकार्य या उपक्रमाला मिळणार असून, नाशिकला देशातील उष्णता-सहनशील शहर म्हणून विकसित करण्यास यामुळे चालना मिळणार आहे.

बिल्डिंग हीट रिझिलिएंट सिटीजमध्ये नाशिक

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या पुढाकाराने झालेल्या या करारावर महापालिका आयुक्त मनीषा खत्री (भा.प्र.से.) आणि एनआरडीसी इंडियाच्या कंट्री हेड सुश्री दीपा बागाई यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी आयआयएम नागपूर येथील महाराष्ट्र शासनाच्या ‘उष्णता सहनशीलता व शाश्वत शीतकरण उत्कृष्टता केंद्रा’चे प्रतिनिधी अमितोष गौतम तसेच महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाच्या ‘बिल्डिंग हीट रिझिलिएंट सिटीज’ या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत देशातील निवडक १२ उष्णता-सहनशील शहरांमध्ये नाशिकची निवड झाली असून, प्रायोगिक प्रकल्पासाठी नाशिक महानगरपालिकेस ५ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. या निधीचा प्रभावी वापर करण्यासाठी एनआरडीसी इंडिया व उत्कृष्टता केंद्राचे तांत्रिक सहकार्य लाभणार आहे.

महापालिका-एनआरडीसी इंडियात पाच वर्षांचा करार

करारापूर्वी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी ‘सिटी कूलिंग’ विषयावर सविस्तर सादरीकरण करून नाशिकच्या उष्णता-सहनशील विकासाची दिशा स्पष्ट केली. या करारांतर्गत प्रभागनिहाय उष्णता नकाशे, उष्णता कृती आराखड्याचे अद्ययावतीकरण, शीत निवारे व सावली व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, आरोग्य यंत्रणेची पूर्वसज्जता, जनजागृती, प्रशिक्षण तसेच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी उष्णता-सहनशील नियोजनावर काम करण्यात येणार आहे. प्राप्त निधीतून तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यावर भर राहील. शास्त्रीय माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि विभागीय समन्वयातून नाशिकची उष्णता-सहनशीलता वाढविण्यात येईल,” असे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्पष्ट केले. हा करार अ-आर्थिक स्वरूपाचा असून पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे. ‘अमृत नाशिक २०४७’ या संकल्पनेतील पर्यावरण, आरोग्य, उपजीविका, ज्ञान आणि सुशासनाच्या उद्दिष्टांना हा उपक्रम बळकटी देणार आहे.उष्णतेपासून सुरक्षित, शाश्वत आणि राहण्यायोग्य नाशिक घडविण्याच्या दिशेने हा करार महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

उष्णता ही आता केवळ हवामानाची बाब राहिलेली नाही; ती सार्वजनिक आरोग्य, उपजीविका आणि शहराच्या अर्थव्यवस्थेशी निगडित बाब आहे. देशातील १२ उष्णता-सहनशील शहरांमध्ये नाशिकची निवड आणि मिळालेले ५ कोटी रुपयांचे अनुदान ही आमच्यासाठी जबाबदारी आहे. प्रकल्प कागदावर न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरावा, यासाठी हा करार करण्यात आला आहे. सिंहस्थ कुंभमेळा २०२७ हा नाशिकच्या उष्णता-सहनशील शहर व्यवस्थापनाचे जागतिक उदाहरण ठरावे, हे आमचे उद्दिष्ट आहे, असे महापौर हिमगौरी आहेर-आडके म्हणाल्या.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >