Thursday, September 3, 2026

Ashwini Bhide : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे

Ashwini Bhide : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम - २०२६ अंतर्गत प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव नसल्यास किंवा नोंदीबाबत आक्षेप असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी मतदारांना विविध माध्यमांतून कळविण्यात येत आहे. तथापि, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांनी केले आहे. दरम्यान, मुंबईत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम - २०२६ अंतर्गत मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले आहे.

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR)-२०२६ कार्यक्रमासंदर्भात राजकीय पक्षांची बैठक महानगरपालिका मुख्यालयात गुरुवारी ०३ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडली.

अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा-लवंगारे, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सह आयुक्त (कर निर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR)-२०२६ कार्यक्रमासंदर्भात सुरू असलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. या कार्यक्रम अंतर्गत आतापर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या गृहभेटी, गणना पत्र वाटप, संकलन आणि डिजिटायझेशन, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध, मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व त्यास निवडणूक आयोगाकडून मान्यता आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सद्यस्थितीत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीदरम्यान दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच, ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती निकालात काढून ०४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी सांगितले की, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR)-२०२६ कार्यक्रमाची प्रक्रिया विधानसभा मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी (ईआरओ), सहायक मतदार नोंदणी अधिकारी (एईआरओ), पर्यवेक्षक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) यांच्या समन्वयाने विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. तथापि, राजकीय पक्षांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या समन्वयाने मतदारांशी संपर्क साधून त्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. तसेच, ही संपूर्ण प्रक्रिया योग्यप्रकारे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील आश्विनी भिडे यांनी यावेळी केले. (Ashwini Bhide)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >