Nashik : गणेशोत्सवासाठी नाशिक पोलिसांची तगडी तयारी, ९९ सराईत गुन्हेगार तडीपार, संवेदनशील भागांवर विशेष नजर

Nashik : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. केवळ चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त तैनात करण्याऐवजी गुन्हेगारीला आळा घालण्यावर आणि संभाव्य धोके वेळीच हेरण्यावर पोलिसांचा भर आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील तब्बल ९९ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, शांततेला बाधा आणणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.



गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर करडी नजर


यंदाचा गणेशोत्सव निर्विघ्न, शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडावा, यासाठी नाशिक शहर पोलीस आणि ग्रामीण पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. गणेश मंडळांच्या मिरवणुका, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचबरोबर घातपाताच्या शक्यता लक्षात घेता दहशतवादी विरोधी पथक म्हणजेच एटीएस आणि बॉम्ब शोधक-नाशक पथक म्हणजे बीडीडीएस यांच्याकडून गोपनीय पाळत ठेवण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवरही पोलिसांची करडी नजर असणार आहे. गेल्या पाच वर्षांत सातत्याने गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांची यादी गुन्हे शाखेकडून तयार करण्यात आली आहे. तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार गणेशोत्सवाच्या काळात पुन्हा शहरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, यासाठी विशेष पथकांकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्डवरील फरार गुन्हेगारांचाही शोध घेण्यात येत आहे.



प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत साउंड लेव्हल मीटर


गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिरवणुका आणि गर्दी होत असल्याने ध्वनीप्रदूषणाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी नाशिक पोलिसांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत ध्वनीप्रदूषण मापक यंत्रे म्हणजेच साउंड लेव्हल मीटर उपलब्ध करून दिली आहेत. मंडपांमध्ये किंवा मिरवणुकीदरम्यान ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाज होत असल्याचे आढळल्यास पोलिसांकडून जागेवरच ध्वनीची पातळी तपासली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तातडीने कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी उत्सव साजरा करताना ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ग्रामीण भागातही गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेला प्रोत्साहन दिले जात असून, गावागावांमध्ये शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. गणेश मंडळांचे पदाधिकारी, नागरिक आणि प्रशासन यांच्यात समन्वय ठेवण्यावर पोलिसांचा भर आहे.



एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथकही मैदानात


दरम्यान, नाशिक शहरासोबतच मालेगाव शहर आणि मालेगाव कॅम्प या संवेदनशील भागांमध्ये पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. या परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असून, संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एसआरपीएफ आणि दंगल नियंत्रण पथकाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या सूचनेनुसार शहर आणि जिल्ह्यातील हॉटेल, लॉज तसेच ढाब्यांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून अचानक छापे टाकून संशयास्पद व्यक्ती किंवा हालचालींची तपासणी केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांची नजर राहणार आहे.


एकूणच, यंदाच्या गणेशोत्सवात भक्तीचा उत्साह कायम ठेवतानाच कायदा आणि सुव्यवस्थेला कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी नाशिक पोलिसांनी व्यापक सुरक्षा आराखडा तयार केला आहे. ९९ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यापासून ते ध्वनीप्रदूषणावर थेट कारवाई, संवेदनशील भागात विशेष बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि गुप्त पाळत तसेच बीडीडीएस आणि एटीएसच्या सतर्कतेपर्यंत विविध पातळ्यांवर पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचे चित्र आहे.

Comments
Add Comment

Krishna Janmashtami 2026 : बाळगोपाळाच्या पूजेचा 'हा' सर्वोत्तम मुहूर्त कमी लोकांना माहित; जाणून घ्या योग्य वेळ आणि पूजा पद्धत!

श्रावण आणि भाद्रपद महिन्यांचे आगमन म्हणजे भारतीय संस्कृतीत विविध धार्मिक सण-उत्सवांची पर्वणीच असते. या काळात

Nashik : उष्णतेच्या तडाख्यापासून नाशिकला ‘कवच’! महापालिका-एनआरडीसी इंडियात पाच वर्षांचा करार

Nashik : वाढत्या उष्णतेचा शहराच्या आरोग्य, उपजीविका आणि अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी नाशिक

Nitesh Rane : 'शिप ब्रेकिंग पॉलिसी' अंतर्गत २०३० पर्यंत ७० हजार रोजगारनिर्मितीचे लक्ष्य; मंत्री नितेश राणे यांची माहिती

जहाज बांधणी, जहाज तोडणीसाठी स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र पहिले राज्य मुंबई : भारताच्या जहाज बांधणी आणि जहाज

Ashwini Bhide : आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी मतदारांना प्रोत्साहित करावे

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : भारत निवडणूक

Nitesh Rane : दिशा सालियन प्रकरणात आता खरे मुखवटे समोर येतील!

- मंत्री नितेश राणे; भगिनीला न्याय मिळाला याचा आम्हाला आनंदच मुंबई : दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

Hanuman Ansh Global Release : भारतात धुमाकूळ घातल्यानंतर ‘हनुमान अंश’ आता जगभरात पोहोचणार; 11 सप्टेंबरला ग्लोबल रिलीज

भारतीय चित्रपटगृहांमध्ये चांगला प्रतिसाद मिळवल्यानंतर ‘हनुमान अंश’ हा हिंदी भक्तिपर चित्रपट आता जगभरातील