Friday, September 4, 2026

Auto Taxi Driver Scheme : ६५ वर्षे पूर्ण झालेल्या चालकांसाठी खूशखबर! मिळणार 'निवृत्ती सन्मान' अन् 'इतक्या' रुपयांचा निधी!

Auto Taxi Driver Scheme : ६५ वर्षे पूर्ण झालेल्या चालकांसाठी खूशखबर! मिळणार 'निवृत्ती सन्मान' अन् 'इतक्या' रुपयांचा निधी!

मुंबई : दिवसरात्र मेहनत करून प्रवाशांची सेवा करणाऱ्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ रिक्षा-टॅक्सी चालकांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देण्यासाठी 'निवृत्ती सन्मान योजना' सुरू करण्यात आली असून, याअंतर्गत ६५ वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला जात आहे. परिवहन विभाग आणि धर्मवीर आनंद दिघे कल्याण मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष कार्यक्रमात प्राथमिक टप्प्यात ७३५ पात्र ज्येष्ठ चालकांच्या बँक खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या उपक्रमाचे कौतुक करत ही योजना चालकांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

सामाजिक सुरक्षेसह मुलांच्या शिक्षणालाही हातभार

या योजनेचा उद्देश केवळ निवृत्ती मानधनापुरता मर्यादित नसून, चालकांच्या संपूर्ण कुटुंबाला सामाजिक सुरक्षेचे कवच देण्याचा आहे. योजनेअंतर्गत अपंगत्व विमा, जीवन विमा आणि वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच कर्तव्यावर असताना अपघात किंवा दुखापत झाल्यास चालकांना विशेष सहाय्य मिळेल. रिक्षा-टॅक्सी चालकांच्या पाल्यांना शिक्षणात प्रगती करता यावी म्हणून दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना ५,००० रुपये तर बारावी उत्तीर्ण होणाऱ्या पाल्यांना ७,००० रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. याशिवाय, पदवी अभ्यासात ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देऊन त्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग सुकर केला जाणार आहे.

कल्याण मंडळाच्या निधीत मोठी वाढ; 'आदर्श चालक-मालक' अभियानाची सूचना

रिक्षा व टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या कल्याण मंडळाच्या प्रवासाबद्दल बोलताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सुरुवातीला ५० कोटी रुपयांच्या निधीने सुरू झालेल्या या मंडळाची व्याप्ती आता १,००० ते १,२०० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. यासोबतच, प्रवाशांशी प्रामाणिकपणे आणि सौजन्याने वागणाऱ्या उत्कृष्ट चालकांचा गौरव करण्यासाठी राज्यात ‘आदर्श चालक-मालक’ अभियान राबवण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >