Friday, September 4, 2026

Ashwini Paul : स्वतः राष्ट्रीय कुस्तीपटू, MSF मध्ये नोकरी अन् नवरा मात्र...अश्विनी पौळ यांच्या निर्णयामागील 'ते' मोठे कारण आले समोर

Ashwini Paul : स्वतः राष्ट्रीय कुस्तीपटू, MSF मध्ये नोकरी अन् नवरा मात्र...अश्विनी पौळ यांच्या निर्णयामागील 'ते' मोठे कारण आले समोर

धाराशिव : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक अत्यंत वेदनादायी घटना धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावर घडली आहे. कौटुंबिक कलह आणि सासरच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू अश्विनी मनोहर पौळ (Ashwini Manohar Paul) यांनी आपल्या तीन लहान मुलांसह उपळी बुरुजावरून तब्बल १०० फूट खोल दरीत उडी मारली. या घटनेत अश्विनी पौळ आणि त्यांचा साडेपाच वर्षांचा मुलगा अजिंक्य यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान अडीच वर्षांच्या दुसऱ्या मुलीनेही प्राण सोडले, तर तिसरी लहान मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर सध्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

रिक्षाचालक पती अन् माहेरची पार्श्वभूमी

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अंबुलगा येथील रहिवासी असलेल्या अश्विनी पौळ यांचे वडील पेशाने शिक्षक आहेत. स्वतः क्रीडा क्षेत्रात नावारूपास आलेल्या अश्विनी यांनी महाराष्ट्र सुरक्षा दलात (MSF) नोकरीही केली होती. मात्र, रिक्षाचालक असलेल्या पतीच्या हट्टाखातर त्यांनी काही महिन्यांपूर्वीच या नोकरीचा राजीनामा दिला होता. गेल्या तीन महिन्यांपासून त्या आपल्या तीन लहान मुलांसह माहेरीच राहत होत्या. नोकरी सोडल्यापासून आणि कौटुंबिक वाद वाढल्याने त्या प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या.

"सासरच्या त्रासानेच घात केला"; वडिलांचा गंभीर आरोप

अश्विनी यांनी घेतलेल्या या अत्यंत टोकाच्या निर्णयाने सर्वांनाच सुन्न केले आहे. घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. "माझी मुलगी गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक आणि कौटुंबिक छळाला सामोरी जात होती. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासामुळेच ती मानसिकदृष्ट्या खचली होती आणि त्यातूनच हे भीषण पाऊल उचलले गेले," असा आक्रोश त्यांनी व्यक्त केला.

किल्ला पाहण्याच्या बहाण्याने घडला थरार

आपल्या तीन चिमुकल्यांना घेऊन अश्विनी नळदुर्ग किल्ला पाहण्याच्या बहाण्याने तिथे पोहोचल्या होत्या. उपळी बुरुजावर गेल्यानंतर त्यांनी अचानक मुलांसह खोल दरीत उडी घेतली. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबवले. हा प्रकार कौटुंबिक त्रासातून आत्महत्येचाच असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >