मुंबई : संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पावन तपोभूमी असलेल्या देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र गडाच्या सद्यस्थितीचा सर्वंकष अभ्यास करून येत्या एका महिन्याच्या आत अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिले आहेत. भंडारा व भामचंद्र डोंगर परिसर तात्काळ 'संरक्षित क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात यावा, तसेच या ऐतिहासिक व आध्यात्मिक परिसरात सातत्याने होणारे अवैध उत्खनन आणि अनधिकृत बांधकामे कायमस्वरूपी थांबवण्यात यावीत, अशी ठाम मागणी तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीने केली होती. यासाठी शासनाने २०११ मध्ये तयार केलेली राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना तातडीने लागू करण्याची विनंतीही समितीने सांस्कृतिक कार्य मंत्र्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईतील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली एका महत्त्वपूर्ण संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर एक थक्क करणारा चमत्कार समोर आला आहे. त्रिशुली-३ ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून ...
सर्व संबंधित विभागांना समन्वयाचे आदेश
भंडारा-भामचंद्र गडाच्या संपूर्ण परिसराशी राज्य शासनाच्या विविध विभागांचा थेट संबंध येतो. त्यामुळे सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय असणे अत्यंत गरजेचे आहे. ही बाब विचारात घेऊन मंत्री ॲड. शेलार यांनी मुख्य सचिवांना सूचना देऊन, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून परिसराच्या सद्यस्थितीचा सविस्तर अभ्यास करण्याचे आणि एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या संपूर्ण कार्यवाहीसाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी सर्व विभागांमध्ये आवश्यक समन्वय साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अधिसूचना आणि उत्खननाची सद्यस्थिती
बैठकीदरम्यान पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये राज्य संरक्षित स्मारकाबाबत अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला होता. २०१७ मध्ये विधी व न्याय विभागाने काही बदल सुचवून तो प्रस्ताव परत पाठवला होता. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने २०२५ मध्ये सर्व आवश्यक सुधारणा करून नवीन सुधारित प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पुन्हा सादर केला आहे. दुसरीकडे, या डोंगर परिसरात होणाऱ्या उत्खननाबाबत जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या (MIDC) अधिकाऱ्यांनीही आपली बाजू मांडली. या अवैध उत्खननाची पाहणी आणि तपासणी करण्यासाठी एक संयुक्त समिती गठीत करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती
या बैठकीस तपोभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांच्यासह समितीचे प्रतिनिधी, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन, एमआयडीसी तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






