Friday, September 4, 2026

Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कष्टाला सन्मानाची जोड, आनंद दिघे यांच्या नावाने उभे राहिलेले महामंडळ देशासाठी आदर्श; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Eknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांच्या कष्टाला सन्मानाची जोड, आनंद दिघे यांच्या नावाने उभे राहिलेले महामंडळ देशासाठी आदर्श; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : दिवसभर अथक परिश्रम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली ‘निवृत्ती सन्मान योजना’ देशातील पहिली योजना असून ती कष्टकरी चालकांसाठी वरदान ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. परिवहन विभाग आणि ‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळा’च्या वतीने आयोजित सन्मान निधी वाटप सोहळ्यात वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या ७३५ सभासदांच्या खात्यात प्रत्येकी १० हजार रुपयांचा सन्मान निधी जमा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

शिंदे म्हणाले, नोकरी करणाऱ्याला निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन मिळते; मात्र रिक्षा-टॅक्सी चालकांना असा आधार मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असताना ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आजचा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील आगळावेगळा आणि जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. या योजनेत ६५ वर्षांनंतर १० हजार रुपयांच्या सन्मान निधीसोबत जीवन विमा, अपंगत्व विमा, आरोग्यविषयक लाभ, कर्तव्य बजावताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य आणि मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचे लाभ मिळणार आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ५ हजार, बारावी उत्तीर्णांना ७ हजार आणि पदवी परीक्षेत ६० टक्के गुण मिळविणाऱ्यांना शिष्यवृत्ती देण्याचेही प्रस्तावित आहे.

मी मुख्यमंत्री असताना स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे यांच्या नावाने या महामंडळाची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी ५० कोटी रुपयांचे सीड कॅपिटल देण्यात आले होते. आता महामंडळाची व्याप्ती वाढून यावर्षी १ हजार ते १२०० कोटी रुपयांपर्यंत निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आनंद दिघे साहेब हे तळागाळातील माणसाला संकटात मदतीचा हात देणारे नेतृत्व होते. त्यांच्या नावाने सुरू झालेले महामंडळही त्याच भावनेने कष्टकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, असे शिंदे यांनी नमूद केले.

रिक्षा-टॅक्सी चालकांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्यांनी ‘आदर्श रिक्षा-टॅक्सी चालक-मालक’ अभियान राबवून प्रामाणिक चालकांचा सन्मान व पुरस्कार करावा, अशी सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना केली. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचविणे, प्रवाशांचे हरवलेले पैसे परत करणे, महिलांना सुरक्षितपणे घरी पोहोचविणे अशा सामाजिक कार्याला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी दिलेल्या प्रतिसादाचाही त्यांनी उल्लेख केला. ३६ जिल्ह्यांत १८० केंद्रांमधून सुमारे १८०० जण हे अभियान राबवत असून १ लाख ६५ हजार जणांनी सहभाग घेतला आहे. २ ऑक्टोबर ते २३ जानेवारीदरम्यान हे अभियान पुन्हा व्यापक स्वरूपात राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.

‘शब्द दिला की तो पूर्ण करतो’, असे सांगताना शिंदे यांनी समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचा दाखला दिला. सरकारवरील विश्वास, कमिटमेंट आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुती सरकार सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी आणि कष्टकरी घटकांच्या पाठीशी असून परिवहन विभागाने अपघात कमी करणे, ब्लॅक स्पॉटवर उपाययोजना करणे आणि प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार शिवाजी पाटील, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, प्रा. प्रदीप ढवळ, रवी गायकवाड, हेमांगी पाटील यांच्यासह रिक्षा-टॅक्सी चालक-मालक उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >