Prakash Abitkar : मागील तीन वर्षांच्या कामगिरीच्या आधारे श्रेणी निश्चित होणार; उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना पुढील जबाबदाऱ्यांमध्ये प्राधान्य

कामगिरीला मान्यता, गुणवत्तेला संधी


सार्वजनिक आरोग्य विभागात अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ गुणांकन


मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागात कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृती रुजविण्याच्या दृष्टीने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांचे दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीने गुणांकन करण्यात येणार असून, मागील तीन वर्षांतील कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचे वाटप, पुढील तीन वर्षांचे कार्यनियोजन, भविष्यातील नियुक्त्यांच्या वेळी केला जाणार आहे.


या निर्णयामुळे सार्वजनिक आरोग्य विभागात सेवाज्येष्ठतेसोबतच प्रत्यक्ष कामगिरी, नेतृत्वक्षमता, रुग्णसेवा, आर्थिक शिस्त, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यांना महत्त्व मिळणार आहे. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या क्षमतेनुसार त्यांना पुढील संधी देण्याची व्यवस्था निर्माण होणार असल्याने अधिकाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासही मदत होणार आहे.



तीन वर्षांच्या कामगिरीचे ‘रिपोर्ट कार्ड’


३१ मार्च २०२६ रोजी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांच्या कामाची माहिती अद्ययावत करून त्यांचे गुणांकन केले जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या तीन वर्षांतील पदावरील कामकाजाचा विचार करून एकूण १०० गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या गुणांकनानुसार अधिकाऱ्यांचे अ, ब, क आणि ड अशा चार श्रेणींत वर्गीकरण केले जाणार आहे. दरवर्षी ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.



रुग्णसेवेपासून डिजिटल कामकाजापर्यंत ११ कसोट्या


अधिकाऱ्यांचे गुणांकन करताना केवळ कागदोपत्री कामकाजाचा विचार न करता जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे. लोकाभिमुखता, तक्रार निवारण, नेतृत्वगुण, विशेष कौशल्य, प्रशिक्षण आणि संवादकौशल्य यांचा विचार केला जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजन, राज्य लेखाशीर्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि CSR निधीचा प्रभावी वापर यासाठी केलेले आर्थिक व्यवस्थापनही तपासले जाणार आहे. आरोग्य संस्थांमधील आहार, औषधांचा पुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करून आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी केलेली कार्यवाहीही गुणांकनाचा भाग असेल.


अधिनस्त रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमधील मनुष्यबळ व्यवस्थापन, नैसर्गिक आपत्ती, साथीचे आजार व अपघातांच्या काळातील कामगिरीलाही महत्त्व दिले जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कार्यक्रमांची अंमलबजावणी, शासनाच्या विशेष अभियानांची प्रभावी अंमलबजावणी, तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’, अरुणोदय-सिकलसेलमुक्त महाराष्ट्र, पॅलेटिव्ह केअर अभियान आणि कर्करोगमुक्त महाराष्ट्र यांसारख्या उपक्रमांतील योगदानाचाही विचार केला जाणार आहे.


त्यासोबतच आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य विभागाच्या विविध पोर्टलवरील माहिती अद्ययावत करणे, महाकर्मी पोर्टलवरील कामकाज, एकत्रित आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी या डिजिटल व योजनाधारित कामगिरीलाही गुण दिले जाणार आहेत. पुढील तीन वर्षांत करावयाच्या कामांचे नियोजन याचाही विचार केला जाणार आहे.



गुणवत्तेसोबत सचोटीलाही महत्त्व


अधिकाऱ्यांच्या नामनिर्देशनासाठीही स्पष्ट निकष निश्चित करण्यात आले आहेत. संबंधित अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील आणि किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोणतीही शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित अथवा प्रस्तावित नसणे, अपहाराच्या प्रकरणात सहभाग नसणे आणि गंभीर स्वरूपाच्या तक्रारी नसणे आवश्यक आहे. उत्कृष्ट चारित्र्य आणि निर्विवाद सचोटी हा देखील नामनिर्देशनाचा महत्त्वाचा निकष ठेवण्यात आला आहे. त्यामुळे केवळ कामाची आकडेवारी नव्हे तर अधिकाऱ्याची प्रशासकीय प्रतिमा आणि प्रामाणिकपणालाही महत्त्व मिळणार आहे.



‘काम करणाऱ्याला संधी’चा स्पष्ट संदेश


सार्वजनिक आरोग्य विभागातील जिल्हास्तरीय यंत्रणेचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निर्णय क्षमतेचा थेट परिणाम नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्यसेवेवर होतो. त्यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कामाची योग्य दखल आणि त्यानुसार पुढील संधी मिळावी, हा या निर्णयाचा केंद्रबिंदू आहे. या प्रक्रियेमुळे अधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक स्पर्धा निर्माण होऊन आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णसेवा, योजनांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढण्यास चालना मिळणार आहे. नियुक्त्या आणि जबाबदाऱ्यांच्या वाटपात गुणवत्ता व पारदर्शकतेला अधिक महत्त्व मिळणार असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कामकाजातही सकारात्मक बदल अपेक्षित आहे.


आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागात गुणवत्ता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व यांना केंद्रस्थानी ठेवून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. या प्रक्रियेला प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक आणि आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांच्या प्रशासकीय अनुभवाची साथ मिळणार आहे. तीन वर्षांची कामगिरी, १०० गुणांचे मूल्यांकन आणि स्पष्ट श्रेणीकरण यामुळे अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन अधिक शिस्तबद्ध पद्धतीने करता येणार आहे.


‘कामगिरीला मान्यता आणि गुणवत्तेला संधी’ या सूत्रावर आधारित व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यपद्धतीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. कामगिरीआधारित प्रशासकीय कार्यसंस्कृतीमुळे अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास, आरोग्यसेवेचा दर्जा उंचावण्यास आणि लोकाभिमुख आरोग्यसेवा अधिक प्रभावीपणे साकारण्यास महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : नशामुक्त भारत अभियान अंतर्गत उद्या इंदौर मध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा जेन झी शी संवाद

मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा उद्या

Central Railway : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; कोकणवासीयांसाठी ३४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या धावणार

Mumbai : गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिला आहे. प्रवाशांच्या

Pratap Sarnaik : सरनाईकांच्या कानपिचक्यांनी... एसटीची गाडी रुळावर; ऑगस्टमध्ये एसटीच्या उत्पन्नात ६६ कोटींची वाढ

प्रवाशांच्या मागणीनुसार फेऱ्या वाढविण्याचा सकारात्मक परिणाम मुंबई : एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी

Jai Jawan Govinda Pathak : सलग 4 वेळा प्रयत्न, तरीही जय जवान अपयशी! यंदा दहीहंडीत नक्की काय बिनसले?

 मुंबई : राज्यभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून मुंबई आणि ठाण्यात गोविंदा पथकांनी उंच मानवी

DahiHandi 2026 : मुंबईत गोविंदा अपघातांची ताजी आकडेवारी समोर; जखमी गोविंदांचा आकडा 376 वर; 286 जणांना डिस्चार्ज

मुंबई : मुंबईत (Mumbai) दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना विविध दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या गोविंदांची

Mumbai Fire : मुंबईत मध्यरात्री दोन ठिकाणी आगीच्या घटना; धारावीत गॅस सिलिंडरच्या भडक्यात दोन मुलांसह चार जण जखमी