नवी दिल्ली : नवी दिल्लीत पार पडलेल्या १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेत बोलताना चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मध्य पूर्वेतील युद्ध तात्काळ थांबवण्यासाठी ब्रिक्स देशांनी शांतता दूताची भूमिका बजावावी, असे आवाहन केले आहे. चिनी सरकारी वाहिनी 'सीसीटीव्ही'ने (CCTV) दिलेल्या माहितीनुसार, हा संघर्ष आंतरराष्ट्रीय शांततेसाठी घातक असून चीन यावर तोडगा काढण्यासाठी इतर ब्रिक्स सदस्यांसोबत काम करण्यास तयार आहे. याच परिषदेत त्यांनी पुढील (१९ व्या) ब्रिक्स शिखर परिषदेचे यजमानपद चीन भूषवणार असल्याचे जाहीर केले.
मध्य पूर्वेतील तणावावर भाष्य
मुंबई : २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हिरो' (Hero Movie) चित्रपटाला वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक पोस्ट शेअर करताना गाण्याचे संगीतकार आणि गीतकाराचे नाव न ...
पश्चिम आशियातील युद्धावर चिंता व्यक्त करताना जिनपिंग म्हणाले की, या संघर्षाची मोठी किंमत तिथल्या सर्वसामान्य जनतेला मोजावी लागत आहे. यामुळे जागतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला असून ब्रिक्स देशांनी केवळ प्रेक्षक न राहता शांततेसाठी ठोस पावले उचलली पाहिजेत. कोणत्याही देशाच्या सार्वभौमत्वावर होणाऱ्या आक्रमणाचा ब्रिक्सने एकत्र येऊन विरोध केला पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर टीका आणि तंत्रज्ञानात सहकार्याचा प्रस्ताव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या जाचक टॅरिफचा (आयात शुल्क) थेट उल्लेख न करता जिनपिंग यांनी जागतिक व्यापारातील या मनमानी धोरणांवर कडाडून टीका केली. मुक्त व्यापारात अडथळे आणणाऱ्या अशा धोरणांविरोधात ब्रिक्स देशांनी एकत्रितपणे उभे राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यासोबतच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्व ब्रिक्स देशांनी एकत्र काम करावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. AI च्या मदतीने सदस्य देशांमध्ये नव्या औद्योगिक क्रांतीला गती देता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा भारत दौरा : महत्त्वाचे टप्पे
चिनी अध्यक्षांचा हा भारत दौरा दोन्ही देशांतील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. ऑक्टोबर २०१९ ला महाबलीपुरम (चेन्नई) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग यांची अनौपचारिक भेट झाली होती. जून २०२० ला गलवान खोऱ्यातील हिंसक चकमकीनंतर भारत आणि चीनमधील द्विपक्षीय संबंध कमालीचे ताणले गेले आणि सीमेवर तणाव वाढला. ऑक्टोबर २०२४ ला रशियातील कझान येथे आयोजित ब्रिक्स परिषदेत दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक द्विपक्षीय चर्चा झाली. त्यानंतर ऑगस्ट २०२५ ला चीनमधील तियानजिन येथे पार पडलेल्या 'एससीओ' (SCO) परिषदेत पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना २०२६ च्या ब्रिक्स परिषदेसाठी भारत दौऱ्याचे निमंत्रण दिले होते.






