Tuesday, September 15, 2026

Police Rescue : विरारमध्ये पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ; आर्थिक विवंचनेतून चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचे वाचले प्राण

Police Rescue : विरारमध्ये पोलिसांच्या तत्परतेने टळला अनर्थ; आर्थिक विवंचनेतून चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबाचे वाचले प्राण

विरार: आर्थिक विवंचना, कौटुंबिक तणाव आणि भविष्याची चिंता यांमुळे टोकाचे पाऊल उचलत पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाचे प्राण विरार पोलिसांनी प्रसंगावधान राखून वाचवले आहेत. मध्यरात्री आलेल्या एका फोननंतर पोलिसांनी अवघ्या २० मिनिटांत घटनास्थळी धाव घेत एकाच कुटुंबातील चारही जणांचे जीव वाचवल्याने सर्वत्र पोलिसांच्या कार्याचे कौतुक होत आहे.(Police Rescue)

नेमकी घटना कशी घडली?

सोमवारी मध्यरात्री सुमारे १:५८ वाजता मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षाला एक अत्यंत गंभीर फोन आला. काशिगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फाउंटन ब्रिज येथे एक तरुण आपल्या पत्नी आणि दोन लहान मुलांसह आत्महत्येच्या तयारीत असल्याची ही माहिती होती. माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही वेळ वाया न घालवता तातडीने हालचाली सुरू केल्या. वर्सोवा बीट मार्शल क्रमांक ४ चे पोलिस हवालदार कोकरे आणि पोलिस शिपाई मोहिते यांनी मध्यरात्रीच्या अंधारात फाउंटन ब्रिजच्या दिशेने धाव घेतली. परिसरातील शांतता आणि अंधारामुळे शोधमोहीम आव्हानात्मक होती, तरीही पोलिसांनी कसून शोध घेत रात्री २:१८ वाजता (म्हणजेच अवघ्या २० मिनिटांत) त्या संशयित तरुणाला त्याच्या पत्नी आणि दोन चिमुकल्या मुलींसह शोधून काढले. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळत चौघांनाही सुरक्षितपणे ताब्यात घेतले आणि एक मोठा अनर्थ टळला.(Police Rescue)

आर्थिक संकट आणि नैराश्य

पोलिसांच्या चौकशीत समोर आले की, संबंधित तरुण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून तो मीरा रोड पूर्वेतील शांती पार्क परिसरात राहतो. काही महिन्यांपूर्वी त्याने बहिणीकडून सोने गहाण ठेवून सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले होते. मात्र, आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाल्याने ते सोने सोडवून त्याची विक्री करणे आणि उरलेली रक्कम बहिणीला परत करणे त्याला जड जात होते. एकीकडे कमालीची आर्थिक अडचण आणि दुसरीकडे त्यातून निर्माण झालेला कौटुंबिक तणाव यामुळे हा तरुण मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला होता. परिस्थितीतून कोणताही मार्ग दिसत नसल्याने त्याने पत्नी आणि अवघ्या दोन व एक वर्षांच्या दोन चिमुकल्या मुलींसह संपण्याचा विचार केला होता.(Police Rescue)

पोलिसांनी दिला जगण्याचा आधार

पोलिसांनी केवळ कायदेशीर कारवाई न करता, त्या उद्ध्वस्त होणाऱ्या कुटुंबाला मानसिक आधार दिला. पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करत अडचणी कितीही मोठ्या असल्या, तरी आत्महत्या हा त्यावरचा मार्ग नाही, अशी समजूत घातली. तसेच, तरुणाच्या भाऊ आणि बहिणीशी संवाद साधत कौटुंबिक वाद मिटवून परिस्थिती सुधारण्याचे आवाहन केले. मध्यरात्री आलेल्या एका फोनने आणि पोलिसांच्या वेगवान कारवाईने चार जीवांना पुन्हा नव्याने जगण्याची अमूल्य संधी मिळवून दिली आहे.(Police Rescue)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >