Wednesday, September 16, 2026

Bihar Flood News : बिहारमध्ये 50 लाख लोक पुराच्या विळख्यात, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

Bihar Flood News : बिहारमध्ये 50 लाख लोक पुराच्या विळख्यात, अनेक राज्यांना पावसाचा इशारा

Bihar Flood News : देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बिहारमधील १५ जिल्ह्यांतील ५७५ पंचायतींमधील अंदाजे ५० लाख लोक अजूनही पुराच्या पाण्याने प्रभावित झाले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने बिहारमधील २६ जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. पूरग्रस्त भागात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान (Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan) यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथक आज नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौरा करणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून अधिकाऱ्यांना केंद्रीय पथकाला नुकसानीची अचूक माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उत्तर प्रदेशातही पूरस्थिती

उत्तर प्रदेशातील अनेक नद्यांना आलेल्या पुरामुळे २६ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. याचा अंदाजे चार लाख लोकांवर परिणाम झाल्याची माहिती आहे. खगरिया जिल्ह्यातील परबत्ता ब्लॉकमधील माधवपूर पंचायतच्या मुरादपूर गावात गंगेची पाणीपातळी काही प्रमाणात ओसरली असली, तरी पुराचा धोका कायम आहे. याचदरम्यान पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाणाऱ्या एका महिलेला गावातील दोन तरुणांनी वाचवल्याची घटना समोर आली आहे.

उत्तराखंडमध्ये भूस्खलनाचा धोका

उत्तराखंडमध्येही पावसामुळे अडचणी वाढल्या आहेत. पिथोरगडमधील आदि कैलास मार्गावरील दोबत येथे भूस्खलन झाल्याने रस्ता पुन्हा बंद झाला आहे. तर रुद्रप्रयागमधील केदारनाथ ट्रेकिंग मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव चिरबासाजवळून यात्रेकरूंना हेल्मेट घालून पुढे पाठवलं जात आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या भूस्खलनात अनेक घोडे आणि खेचरे मृत्युमुखी पडले होते. रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांमुळे दुर्गंधी आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या आहेत.

राजस्थान आणि मध्य प्रदेशातही पावसाचा अंदाज

राजस्थानमधील २६ जिल्ह्यांसाठी १७ सप्टेंबरपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अजमेर, पालीसह अनेक जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. दरम्यान, पश्चिम मध्य प्रदेशात १७ ते १९ सप्टेंबर, तर पूर्व मध्य प्रदेशात १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतही देशातील विविध भागांमध्ये पाऊस, पूर आणि भूस्खलनाच्या परिस्थितीवर प्रशासनाचं लक्ष राहणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >