Wednesday, September 16, 2026

Maharashtra Jobs : ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

Maharashtra Jobs : ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ला नवी बळकटी; महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

मुंबई : राज्यातील युवकांना त्यांच्या जिल्हा, तालुका आणि स्थानिक परिसरात अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला आता आणखी बळकटी मिळाली आहे. यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि पुण्याच्या सृजन ट्रस्ट यांच्यात अधिकृतपणे सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.(Maharashtra Rojgar Mahakumbh)

कराराचा मुख्य उद्देश आणि रोजगार मेळावे

येत्या २९ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘रोजगार महाकुंभ’ची व्याप्ती वाढवणे, जास्तीत जास्त उद्योग व आस्थापनांचा सहभाग सुनिश्चित करणे आणि रोजगार इच्छुक युवकांना थेट रोजगाराच्या संधी मिळवून देणे, हा या कराराचा प्रमुख उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत राज्यभरात विविध ठिकाणी विशेष रोजगार मेळावे आणि प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित केले जाणार आहेत. याद्वारे नोकरी शोधणारे युवक आणि नोकरी देणाऱ्या कंपन्यांना एकाच व्यासपीठावर आणले जाईल. या मेळाव्यांमध्ये उमेदवारांच्या थेट मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची निवड केली जाईल, तसेच शक्य तिथे जागीच नियुक्तीपत्रे (ऑफर लेटर) देण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित केले जाईल.

विविध क्षेत्रांचा सहभाग आणि विशेष जनजागृती

  • उद्योग व स्टार्टअप्सचा सहभाग: सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs), स्टार्टअप्स, विविध कंपन्या आणि सेवा क्षेत्रातील संस्थांना या उपक्रमाशी जोडले जाणार आहे. रिक्त पदे, आवश्यक पात्रता, कौशल्य आणि कामाच्या ठिकाणाची माहिती याद्वारे संकलित केली जाईल.

  • व्यापक जनजागृती: महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय व कौशल्य प्रशिक्षणार्थी, पदवीधर तसेच पदविकाधारकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शैक्षणिक संस्था व सामाजिक संघटनांच्या मदतीने मोहीम राबवली जाईल.

  • समावेशक विकास: महिला, दिव्यांग, ग्रामीण भागातील युवक आणि रोजगाराच्या संधींपासून वंचित राहिलेल्या घटकांच्या सहभागावर विशेष भर दिला जाणार आहे.

पारदर्शक नियोजन आणि प्रभावी मूल्यमापन

मेळाव्यांच्या यशस्वी आयोजनासाठी ऑनलाईन उमेदवार नोंदणी, कंपन्यांसाठी हेल्प डेस्क, मुलाखत व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि स्वयंसेवकांचे चोख नियोजन करण्यात आले आहे. तसेच, निवड झालेल्या उमेदवारांच्या जॉईनिंग स्टेटसचा पाठपुरावा करून या उपक्रमातून प्रत्यक्षात किती युवकांना रोजगार मिळाला, याचे परिणामाधारित मूल्यमापन (Impact Assessment) देखील केले जाणार आहे.(Maharashtra Rojgar Mahakumbh)

मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या अपर सचिव मनिषा वर्मा आणि महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त अमित सैनी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा करार संपन्न झाला. यावेळी सृजन ट्रस्टचे विश्वस्त प्रा. मिलिंद मराठे, दीपक मुकादम, प्रा. वैद्य कैलास सोनमनकर, तसेच विशेष कार्य अधिकारी पंकज पाठक, अमित पटले, श्रेयस जोगळेकर आणि अलका यादव आदी मान्यवर उपस्थित होते.(Maharashtra Rojgar Mahakumbh)

मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे मनोगत:

"राज्यातील युवकांना केवळ रोजगाराची माहिती नव्हे, तर प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र’च्या माध्यमातून युवक आणि उद्योगक्षेत्र एकाच व्यासपीठावर येत आहेत. शासन आणि सामाजिक संस्थांच्या समन्वित प्रयत्नातून हा उपक्रम राज्यातील लाखो युवकांसाठी सुवर्णसंधी निर्माण करेल," असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.(Maharashtra Rojgar Mahakumbh)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >