Thursday, September 17, 2026

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

Sanjay Gandhi National Park : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १८ वर्षांच्या 'बिजली' वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू!

मुंबई : बोरीवली येथील प्रसिद्ध संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून (Sanjay Gandhi National Park) एक दुःखद बातमी समोर आली आहे. २०१६ पासून या उद्यानात वास्तव्यास असलेल्या 'बिजली' (T2) नावाच्या १८ वर्षे चार महिने वयाच्या वाघिणीचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला आहे.

बुधवारी रात्री घेतला शेवटचा श्वास

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, बिजली गेल्या काही दिवसांपासून वयोमानामुळे होणाऱ्या आजारांनी ग्रस्त होती. अखेर बुधवारी (१६ सप्टेंबर) रात्री सुमारे ९:४५ वाजता तिची प्राणज्योत मालवली.

गेल्या महिन्यापासून खालावली होती प्रकृती

उद्यान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यापासून बिजलीने अन्न घेणे कमी केले होते. तिची खालावती प्रकृती पाहून डॉक्टरांचे पथक तिच्या आरोग्यावर सतत लक्ष ठेवून होते. विशेष वैद्यकीय उपचार, देखभाल आणि देखरेखीनंतरही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि बुधवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

पेंच व्याघ्र प्रकल्पातून झाली होती रवानगी

बिजलीला ११ जुलै २०१६ रोजी मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्र प्रकल्पातून बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आले होते. गेल्या एका दशकाहून अधिक काळ ती उद्यानाच्या संरक्षणात होती. या काळात ती पर्यटकांच्या तसेच उद्यानातील कर्मचारी आणि डॉक्टरांच्या विशेष पसंतीस उतरली होती.

पोस्टमार्टमनंतर स्पष्ट होणार अचूक कारण

प्राथमिक माहितीनुसार, वयोमानामुळे उद्भवलेल्या आजारांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. असे असले तरी, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट व्हावे यासाठी वैद्यकीय नियमांनुसार तिचे शवविच्छेदन (Post-Mortem) केले जाणार आहे.

प्रशासनाचे पर्यटकांना विशेष आवाहन

बिजलीच्या निधनानंतर उद्यान प्रशासनाने एक भावनिक आवाहन केले आहे. गेल्या काही वर्षांत ज्या पर्यटकांनी किंवा वन्यजीव प्रेमींनी बिजलीला पाहिले असेल किंवा तिचे फोटो काढले असतील, त्यांनी तिच्या आठवणी आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला श्रद्धांजली वाहावी, असे प्रशासनाने म्हटले आहे. बिजलीच्या जाण्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक महत्त्वाचा अध्याय संपुष्टात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >