Thursday, September 17, 2026

Ganeshotsav 2026 : “स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार - आपले सफाई कर्मचारी!”

Ganeshotsav 2026 : “स्वच्छ मुंबईचे खरे शिल्पकार - आपले सफाई कर्मचारी!”

सफाई कर्मचाऱ्यांना पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची अनोखी मानवंदना!

कलादिग्दर्शक डॉ. सुमित पाटील यांची सुंदर संकल्पना

मुंबई : मायानगरी मुंबईला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी दिवस-रात्र अथक परिश्रम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या अमूल्य योगदानाला सलाम करणारा एक अत्यंत भावुक आणि प्रबोधनात्मक देखावा यंदा ‘पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने (Panchganga Sarvjanik Utsav Mandal) सादर केला आहे. ‘स्वच्छ मुंबईचे शिल्पकार’ या संकल्पनेतून साकारलेला हा देखावा केवळ भक्तीचा नव्हे, तर स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक सशक्त सामाजिक संदेश देत आहे. या अप्रतिम देखाव्याची मूळ संकल्पना आणि कलादिग्दर्शन डॉ. सुमित पाटील यांनी केले आहे.

‘ज्यांच्या हातांनी मुंबई स्वच्छ होते, त्या हातांना सलाम!’

सफाई कर्मचारी हे केवळ कचरा गोळा करणारे कामगार नसून, ते खऱ्या अर्थाने या शहराचे आरोग्य राखणारे ‘शिल्पकार’ आहेत, हा विचार या देखाव्यातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. आपल्या सर्वांच्या घरातून आणि रस्त्यांवरून निर्माण होणारा कचरा उचलून शहर चकाचक ठेवणाऱ्या या घटकाच्या मेहनतीकडे अनेकदा समाजाचे दुर्लक्ष होते. त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील आव्हाने, अहोरात्र चालणारी मेहनत आणि समाजासाठीचे त्यांचे योगदान कलात्मक मांडणीतून येथे जिवंत करण्यात आले आहे.

देखाव्याची खास वैशिष्ट्ये

‘फ्रीसायकल’ (Freecycle) संकल्पना :

आपल्या वापरात नसलेल्या पण चांगल्या स्थितीत असलेल्या वस्तू (उदा. फर्निचर, कपडे, पुस्तके, खेळणी, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स) कचऱ्यात न फेकता त्या गरजूंपर्यंत पोहोचवाव्यात, हा पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश यातून देण्यात आला आहे. यामुळे कचरा तर कमी होईलच, पण एखाद्या गरजूला मदतही होईल.

सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘कलाकार कट्टा’ :

सफाई कर्मचाऱ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी देखाव्यात ‘कलाकार कट्टा’ ही विशेष संकल्पना साकारली आहे. गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला आणि पाककला यांसारख्या कलांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातील कलाकाराचा गौरव करण्याचा हा एक अनोखा प्रयत्न आहे.

पर्यावरण संवर्धन आणि ‘टाकाऊपासून टिकाऊ’

गणेशोत्सवात निर्माण होणाऱ्या कचऱ्याबाबत जनजागृती करताना “मी तुमच्या शहराची कचऱ्याची गाडी बोलते आहे…” या संकल्पनेतून नागरिकांशी थेट संवाद साधला आहे. ओला व सुका कचरा वेगळा करणे, निर्माल्याची योग्य विल्हेवाट लावणे, तसेच प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण सजावटीसाठी प्लास्टिक बाटल्या, स्क्रॅप मेटल, ई-वेस्ट, कागद आणि लाकडासारख्या टाकाऊ साहित्याचा पुनर्वापर करण्यात आला आहे.

भक्ती आणि सामाजिक जाणिवेचा सुंदर संगम!

पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा हा उपक्रम केवळ धार्मिक उत्सवापुरता मर्यादित न राहता, समाजातील प्रत्येक घटकाला पर्यावरणाविषयी आणि सफाई कर्मचाऱ्यांविषयी संवेदनशील बनवणारा ठरत आहे. या अद्वितीय आणि प्रेरणादायी देखाव्याला प्रत्यक्ष भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या योगदानाला वंदना करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >