मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेले उपोषण अखेर स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला. तसेच सरकारला मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. मात्र, उपोषण स्थगित केले असले तरी मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन संपलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jarange Patil)
शिष्टाई चर्चानंतर आंदोलनाची दिशा बदलली
मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले होते. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा निर्णय घेतला होता. 19 सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. मात्र, पाटोदा येथे सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाल्यानंतर आंदोलनाची दिशा बदलली आहे. आता तूर्तास मुंबईकडे जाण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
उधमपूर : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून दहशतवादाविरोधात कारवाई सुरूच आहे. उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम आणि घनदाट जंगलात सुरक्षा दलांनी ...
सरकारच्या शिष्टमंडळाने बीडमधील पाटोदा येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांची मनधरणी केली. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार सुरेश धस, आमदार प्रसाद लाड आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. या चर्चेनंतर काही मागण्यांबाबत सरकारकडून कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे समोर आले आहे. मराठा आरक्षणाशी संबंधित गॅझेट आणि कुणबी नोंदींच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे वृत्त आहे. ( maratha reservation)
कारवाई झाली नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन होणार
जरांगे पाटील यांनी सरकारला पुढील 3 महिन्यांत मागण्यांवर निर्णय घेण्याची मुदत दिली आहे. या काळात अपेक्षित कार्यवाही झाली नाही, तर पुन्हा मुंबईकडे जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या आंदोलन स्थगित झाले असले तरी मराठा आरक्षणाचा मुद्दा कायम असून पुढील काळात सरकारकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.