Thursday, September 17, 2026

Karjat- Panvel Railway Route: २९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल मार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण, केव्हापासून मार्ग रेल्वे धावणार?

Karjat- Panvel Railway Route: २९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल मार्गाचं ९९ टक्के काम पूर्ण, केव्हापासून मार्ग रेल्वे धावणार?
नवी मुंबई: कर्जत- पनवेलकरांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. कर्जतकरांना नवी मुंबईसाठी जाण्यासाठी मारावा लागणारा वळसा आता मारावा लागणार नाही. २९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल मार्गिकेचे काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. दुहेरी मार्गिकेचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून येत्या दिवाळीपासून ही रेल्वे प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. कर्जत- पनवेल ह्या उपनगरीय दुहेरी रेल्वे मार्गिकेच्या माध्यमातून प्रवाशांना हा प्रवास अधिक सुलभ आणि थेट करून देण्याचा मानस रेल्वेचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या ह्या रेल्वे मार्गिकेचं काम आता शेवटच्या टप्प्यात आले आहे. (Mumbai Suburban Railway)
हजारो कोटी रूपये खर्चुन कर्जत- पनवेल मार्ग उभारण्याचं काम सध्या सुरू आहे. कर्जत- पनवेल मार्गिकेवर लोकल सेवा दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वेची तयारी सुरू आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यापूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) मार्गिकेची तपासणी आणि मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प- ३ (एमयूटीपी-3) अंतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत (एमआरव्हीसी) या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. कर्जत- पनवेल मार्गिकेसाठी रेल्वेकडून २ हजार ७८२ कोटी रूपये खर्चले जात आहेत. या मार्गिकेमुळे कर्जत, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम मार्ग उपलब्ध झाला आहे. (Karjat- Panvel Railway Route)
२९.६ किमी लांबीच्या कर्जत- पनवेल रेल्वे मार्गिकेवर कर्जत, चौक, पोयंजे, चिखले आणि पनवेल अशा पाच रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 'मोहापे' रेल्वे स्थानकाचं नाव बदलून 'पोयंजे'करण्यात आलं आहे. प्रकल्पातील बहुतांश नागरी कामे पूर्ण झाली आहेत. रेल्वे मार्गातील सर्व लहान- मोठे पूल, पाच रेल्वे उड्डाणपूल (आरओबी), १६ भूयारी रस्ते (आरयूबी) ह्या सर्व मार्गांचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. मार्गिकेवरील तीनही बोगद्यांचे खोदकाम आणि अंतिम अस्तरीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. पनवेल आणि कर्जतच्या दिशेने असलेले दोन्ही रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाले असून, त्यावर रूळ जोडणीचे काम सुरू आहे. पुणे द्रुतगती महामार्गाखालील भुयारी मार्गातून रूळ जोडणीचे कामही पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०२६ पर्यंत या रेल्वे मार्गिकेचं संपूर्ण काम करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलं आहे. त्यापूर्वी उर्वरित तांत्रिक कामे, यंत्रणांच्या चाचण्या आणि सुरक्षा प्रक्रिया पूर्ण करून सीआरएसची मंजुरी मिळवणे महत्त्वाचे ठरणार आहे. ३५ ते ४० मिनिटांच्या ह्या प्रवासामुळे कर्जत, रायगड आणि नवी मुंबईतील नागरिकांना प्रवास करणं अगदीच सोयीस्कर होणार आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >