मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी 'हनुमान अंश' या चित्रपटाच्या टीमची मुंबईतील 'वर्षा' या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. बॉक्स ऑफिसवर मिळवलेल्या ऐतिहासिक आणि प्रचंड यशाबद्दल त्यांनी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. हा चित्रपट सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून, या आध्यात्मिक नाटकाच्या निर्मात्यांसाठी मुख्यमंत्र्यांची ही भेट अतिशय अभिमानास्पद मानली जात आहे.
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने झाली खास भेट
या भेटीबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी लिहिले, "काल संध्याकाळी 'वर्षा' बंगल्यावर श्री गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या 'हनुमान अंश' चित्रपटाच्या संपूर्ण टीमची भेट घेऊन आनंद झाला. मी विशाल चतुर्वेदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे या उत्तम कामाबद्दल अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील प्रवासासाठी आणि भविष्यातील सर्व प्रोजेक्ट्ससाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत."
अल्प बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू
डॉ. विशाल चतुर्वेदी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'हनुमान अंश' हा चित्रपट प्रदर्शित होऊन ६ आठवड्यांपेक्षा जास्त काळ लोटला असला, तरी चित्रपटगृहांमधील त्याची गर्दी अजिबात कमी झालेली नाही. अवघ्या ₹२ कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु 'नीम करोली बाबा' यांच्या जीवनप्रवासावर आणि विचारांवर आधारित आहे. कोणतीही मोठी स्टारकास्ट नसताना या चित्रपटाने मिळवलेले यश खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने, उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एका खोचक व्यंगचित्राच्या माध्यमातून जोरदार ...
४३ दिवसांत केली तब्बल ₹३१६ कोटींची कमाई
प्रदर्शनाच्या ४३ व्या दिवसापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने भारतात तब्बल ₹२९३.३० कोटींचा एकूण गल्ला जमवला आहे. याशिवाय परदेशातील कमाई ₹२३ कोटींपर्यंत पोहोचली आहे. अशाप्रकारे, जगभरातून या चित्रपटाने आतापर्यंत एकूण ₹३१६.३० कोटींचे रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे.
काय आहे 'हनुमान अंश' चित्रपटाची कहाणी ?
'हनुमान अंश' हा एक भक्ती आणि आध्यात्मिक विषयावर आधारित चित्रपट असून, याची कथा, दिग्दर्शन आणि निर्मिती डॉ. विशाल चतुर्वेदी यांनीच केली आहे. डॉ. चतुर्वेदी यांच्या 'डिवाईन डिटूर: दॅट चेंज्ड माय लाईफ' या गाजलेल्या पुस्तकावर हा चित्रपट बेतलेला आहे. नीम करोली बाबांच्या जीवनावर बनवल्या जाणाऱ्या तीन भागांच्या (Trilogy) मालिकेतील हा पहिलाच भाग असून, पहिल्याच भागाने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.