Saturday, September 19, 2026

Nitesh Rane : संजय राऊत जितके बोलतील, तितक्या लवकर आदित्य ठाकरेंना अटक होईल!

Nitesh Rane : संजय राऊत जितके बोलतील, तितक्या लवकर आदित्य ठाकरेंना अटक होईल!

- मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल; उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कणकवलीतील कथित खुनांची चौकशी का केली नाही?

मुंबई : दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरे कुटुंबियांवर होत असलेल्या आरोपांवरून लक्ष विचलित करण्यासाठी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी कणकवलीत कथित हत्यांच्या मुद्द्यावरून खोटेनाटे आरोप केले. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी त्याला तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिले. "गेल्या अनेक वर्षांपासून एकाच प्रकरणातील नावे घेऊन आरोप केले जात आहेत; मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, सत्ता हातात असतानाच या प्रकरणांची चौकशी का केली नाही", असा सवाल राणे यांनी केला. त्याचबरोबर दिशा सालियन प्रकरणाचा संदर्भ देत राणे यांनी, संजय राऊत आणि उबाठाच्या नेत्यांनी जितके बोलावे, तितका आदित्य ठाकरे अडचणीत येईल, असा इशाराही दिला. (Nitesh Rane)

सिंधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिले. कणकवलीतील गेल्या २० वर्षांतील कथित खुनांचा उल्लेख करत राऊत यांनी गोवेकर, अंकुश राणे, सत्यविजय भिसे आणि नाईक यांच्या नावांचा उल्लेख केला होता. या प्रकरणांमध्ये राणे यांच्या कुटुंबीयांच्या अंगावर आणि हाताला रक्त लागले असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. सत्ता खून पचवण्यासाठी आणि खून दाबण्यासाठी हवी असल्याचेही त्यांनी म्हटले होते. (Nitesh Rane)

राऊत यांच्या या आरोपांवर राणे यांनी, “किती वर्षांपासून आम्ही ही टेप रेकॉर्डर ऐकतोय,” असा सवाल केला. या सर्व प्रकरणांची नावे घेऊन आरोप करण्याचे काम वर्षानुवर्षे सुरू आहे. मात्र, “एवढी वर्षे तुम्ही सत्तेत होता, का नाही केली चौकशी? चौकशी करायला कोणी थांबवले होते? यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ही चौकशी का झाली नाही", याचे उत्तर राऊत यांनी द्यावे, असा प्रतिसवाल केला. सत्ता असताना चौकशी न करता आता पुन्हा त्याच आरोपांची पुनरावृत्ती केली जात असल्याने लोकही या 'टेप रेकॉर्डर'ला कंटाळले असल्याचे त्यांनी सांगितले.

राणे म्हणाले, "दिशा सालियन प्रकरणात आम्हाला राजकारण करायचे नाही, कोणाला टार्गेट, व्हिक्टिमाईज बिलकूल करायचे नाही. ही एका बापाची त्याच्या मुलीसाठी असलेली लढाई आहे. सतीश सालियन हे आपल्या मुलीसाठी लढत असून, आता न्यायालयाच्या निर्देशामुळे ही प्रक्रिया सुरू आहे", असेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात राजकीय व्यक्तींनी पडू नये आणि राजकीय वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन राणे यांनी केले. मात्र, संजय राऊत आणि उबाठाचे नेते या विषयावर जितके बोलतील, तितका आदित्य ठाकरे अडचणीत येईल, असा इशारा त्यांनी दिला. “तुम्ही जेवढं तोंड उघडाल, तेवढं तुमचा मालकाचा मुलगा अडचणीत येणार आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी गप्प बसून आपल्या मालकाच्या मुलाला सुरक्षित ठेवावे,” असा सल्लाही त्यांनी दिला. (Nitesh Rane)

दरम्यान, दोन आमदारांना गोरेगावला नेऊन त्यांच्यासोबत काय घडले, याचा तपास नीट झाला असता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती, असा आरोपदेखील राऊत यांनी केला होता. त्यावर राणे यांनी, वर्षानुवर्षे एकाच नावांचा उल्लेख करून तेच आरोप पुन्हा पुन्हा केले जात आहेत. आता आम्हाला कंटाळा आलेला आहे या गोष्टी ऐकून,” असे सांगत या विषयावर अधिक न बोललेलेच बरे, असे राणे यांनी स्पष्ट केले. (Nitesh Rane)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >