उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला; सुनेत्रा पवार यांच्या विक्रमी विजयाबद्दल केले अभिनंदन
मुंबई : “पश्चिम बंगाल आसाम आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी देशाच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून, हा भव्य विजय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख राजकारणावर जनतेने दिलेली पसंतीची पावती आहे”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सोमवारी दिली. पश्चिम बंगालमध्ये प्रथमच पूर्ण बहुमतासह कमळ फुलले असून, तेथील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या गुंडागर्दी आणि भ्रष्टाचाराला कंटाळून त्यांना पराभवाची 'झालमुडी' खाऊ घातल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
स्टॅलिन यांचा पराभव केल्याबद्दल जनतेचे आभारआसाममधील निकालांवर बोलताना ते म्हणाले की, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता देऊन जनतेने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे. हा विजय विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनाला मिळालेली ठाम साथ आहे. यासोबतच, तामिळनाडूतील निकालांवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी सनातन धर्मावर वादग्रस्त विधाने करणाऱ्या एम. के. स्टॅलिन यांचा पराभव केल्याबद्दल तेथील जनतेचे आभार मानले. लोकशाहीत जनताच सर्वोच्च असते, हे या निकालावरून स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या विकासाभिमुख राजकारणाला कौल
बारामती विधानसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनी मिळवलेल्या विक्रमी विजयाबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. बारामतीच्या जनतेने विकासाभिमुख राजकारणाला पाठिंबा देत अजित पवार यांच्या प्रगतिशील विचारांना कौल दिला आहे. देशभरात विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यांवर आधारित राजकारण बळकट होत असून, आगामी काळात याचा सकारात्मक परिणाम देशाच्या प्रगतीवर दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






