Tuesday, September 1, 2026

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून हिंदुत्त्वासाठी काम करत आहेत आणि त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे, असे कौतुकोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काढले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सहिष्णुता हा हिंदुत्वाचा खरा दागिना असून ती आपण समजून घेतली पाहिजे आणि हिंदुत्त्वात सर्वसमावेशकता असली पाहिजे, असे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. मात्र, याच वेळी सहिष्णुतेचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी, सहिष्णुता म्हणजे कोणी एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा असे नव्हे, तर थोबाडीत मारणाऱ्याला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भूमिका मांडली. आपण स्वतःहून कोणाच्या थोबाडीत मारू नये, कारण हिंदू हा मूळचा सहिष्णू आहे आणि तो सहिष्णूच राहिला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

या मुलाखतीदरम्यान राजकीय मुद्द्यांसोबतच राज्याच्या आर्थिक व औद्योगिक विकासावरही सविस्तर चर्चा झाली. सध्या निर्माणाधीन असलेल्या वाढवण बंदराचा उल्लेख करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकल्पात महाराष्ट्रसह संपूर्ण देशाला ट्रान्सफॉर्म करण्याची मोठी ताकद आहे. सध्या देशाच्या मेरिटाईम क्षेत्रात महाराष्ट्र गेली ३० वर्षे जो पहिल्या क्रमांकावर आहे, त्याचे श्रेय जेएनपीटी बंदराला जाते. मात्र, आगामी काळात उभारले जाणारे वाढवण बंदर हे जेएनपीटीपेक्षा तब्बल तीनपट मोठे असणार आहे. जेएनपीटी बंदर जगातील पहिल्या ३० बंदरांमध्ये मोडत असले, तरी वाढवण बंदर हे जगातील पहिल्या १० पोर्टमध्ये आपले स्थान निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वाढवण बंदराची खासियत सांगताना मुख्यमंत्र्यांनी नमूद केले की, या बंदरात २० मीटरचा खोल ड्रॅफ्ट असणार आहे, ज्यामुळे जगातील सर्वात मोठे जहाजदेखील येथे सहज दाखल होऊ शकते. आंतरराष्ट्रीय व्यापारात ज्यांच्याकडे मेरिटाईम पॉवर असते, तोच व्यापाराचा राजा मानला जातो आणि महाराष्ट्रासाठी वाढवण बंदराने हीच सुवर्णसंधी आणली आहे. या एकाच बंदरामुळे पालघर जिल्ह्यात तब्बल १० लाख नवीन रोजगारांची निर्मिती होणार असून महाराष्ट्र खऱ्या अर्थाने एक मोठी मेरिटाईम पॉवर बनेल. सध्या आपल्यासमोर चीनला सप्लाय चेनमध्ये रिप्लेस करण्याचे मोठे आव्हान असून त्यासाठी देशाची लॉजिस्टिक कॉस्ट कमी करणे गरजेचे आहे. सध्या १४ टक्क्यांवर असलेली ही लॉजिस्टिक कॉस्ट वाढवण बंदरामुळे आणि त्याच्याभोवती उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधांमुळे ७ टक्क्यांवर आणणे शक्य होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >