मुंबईत महापौर बसल्यानंतर जल्लोष साजरा करूया!

-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; २४ तास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना महाविजय समर्पित


मुंबई : मुंबई महानगरपालिकेत महापौर बसल्यानंतर पुन्हा एकदा जल्लोष साजरा करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप कार्यकर्त्यांना केले. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर ते भाजपच्या प्रदेश कार्यालयात आयोजित जल्लोष कार्यक्रमात बोलत होते. पक्षासाठी २४ तास काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना हा विजय समर्पित करत असल्याचे त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात महाराष्ट्राचे भाजप अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार मानतो, कारण महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप आणि महायुतीला मोठा विजय त्यांनी मिळवून दिला. या निवडणुकांमध्ये सगळे रेकॉर्ड तोडले गेले असून, २९ पैकी २५ महानगरपालिकांमध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता आली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जरी मतमोजणीला उशीर होत असला आणि काही मतमोजणी बाकी असली तरी विद्यमान ट्रेंड पाहता, महायुतीला निश्चितपणे पूर्ण बहुमत मिळेल आणि मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल, याबाबत कोणतीही शंका नाही.


ते पुढे म्हणाले की, या निवडणुकीत आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेसमोर गेलो होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे. वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये आम्हाला रेकॉर्डब्रेक जनमत मिळाले आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, की लोकांना विकास आणि प्रामाणिकता हवी आहे. म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिले आहे. आज या निकालाने आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली, की महाराष्ट्राचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. या निकालाच्या निमित्ताने मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही स्मरण करतो, कारण त्यांचा आशीर्वाद महायुतीच्या पाठीशी होता आणि म्हणूनच हा विजय मिळाला आहे.


आमचे हिंदुत्व संकुचित नाही!

- ज्या मुद्द्यांवर आम्ही ही निवडणूक लढलो, त्या मुद्द्यांना लोकांनी प्रतिसाद दिला आणि पुढेही आमचा अजेंडा विकासाचा राहणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. एकेका शहराला परिवर्तित करून तेथे राहणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या जीवनात मोठा बदल घडवण्यासाठी हा विजय आम्ही समर्पित करणार आहोत.
- या सगळ्या प्रक्रियेत एक गोष्ट सांगितली पाहिजे की आमचा कार्याचा आत्मा आणि विचारांचा आत्मा हिंदुत्ववाद आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. हिंदुत्व आणि विकास यांना वेगळे करता येणार नाही. आज हा आमचा आत्मा आम्हाला जनसामान्यांपर्यंत पोहोचवतो आहे.
- आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे नाही, तर व्यापक हिंदुत्व मानणारे आहोत. आमच्या हिंदुत्वात सगळ्यांचा समावेश आहे. जो जो भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो आणि भारतीय प्राचीन जीवनपद्धतीला आपली जीवनपद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती कशीही असली तरी त्यांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत समाविष्ट करतो. म्हणूनच या निमित्ताने इतके मोठे जनसमर्थन मिळाले आहे.


जिंकल्याचा उन्माद नको

- कार्यकर्त्यांना संदेश देताना फडणवीस म्हणाले की, इतके मोठे जनसमर्थन मिळाल्याने आता जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. आपल्याला जबाबदारीने वागावे लागेल. जिंकल्यानंतर उन्माद नको, कोणीही उन्मादात वागणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की जनतेने विश्वासाने तुम्हाला निवडले आहे, त्यामुळे या विश्वासाला तडा जाणार नाही असे वर्तन करा. मला विश्वास आहे की कार्यकर्ते, नेते आणि निवडून आलेले नगरसेवक हे करणार आहेत.
- मुंबई महापौर विराजमान झाल्यानंतर पुन्हा जल्लोष साजरा करू, असे सांगत फडणवीस यांनी आपले मित्र पक्षांचेही आभार मानले. शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय आणि इतर मित्र पक्षांचे मनापासून आभार. इथे येण्यापूर्वी मी एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्यांनी माझे अभिनंदन केले, मी त्यांचे अभिनंदन केले. पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुती मजबुतीने काम करेल, हा विश्वास देतो.

Comments
Add Comment

JNPA : 'जेएनपीए' ठरले जगातील सर्वात वेगाने विकसित होणारे कंटेनर बंदर

- जागतिक मानांकनात २१ व्या स्थानी झेप; मंत्री नितेश राणे यांनी केले अभिनंदन मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर

Expired Food Scam : मुदत संपलेल्या 'फूड पॅकेट्स'ची तारीख बदलून विक्री

- 'एफडीए'कडून टोळीचा पर्दाफाश; तुर्भे 'एमआयडीसी'मधून ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त मुंबई : अन्नपदार्थांच्या

ST Bus NCMC Card : एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १ सप्टेंबरपासून ज्येष्ठ नागरिक, महिलांना NCMC कार्ड अनिवार्य

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला

Maharashtra SIR Voter List : राज्यातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध

- २ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली; ३० सप्टेंबरपर्यंत दाखल करता येणार हरकती  मुंबई : विशेष सखोल पुनरिक्षण

Elon Musk :‘फक्त शाश्वत ऊर्जा पुरेशी नाही’; पृथ्वीच्या भवितव्याबाबत एलॉन मस्क यांचा मोठा इशारा

टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क यांनी पृथ्वीच्या दीर्घकालीन भवितव्याबाबत महत्त्वाचा इशारा दिला आहे.

Jalgaon Crime : संतापजनक ! ‘दुधा’च्या नावाखाली काळा धंदा ! गायीच्या दुधात चक्क 'या' तेलाची भेसळ अन् पुढे...

Jalgaon Crime : गायीच्या दुधात थेट सोयाबीन तेल मिसळून त्याची फॅट वाढवायची आणि हेच भेसळयुक्त दूध ‘म्हशीचे दूध’ म्हणून