'आजारपणात जोडीदाराची साथ सोडणे अमानुष'; मद्रास उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द केला
लग्नानंतर पत्नीला झालेल्या शारीरिक अडचणीमुळे घटस्फोटाची मागणी करणाऱ्या पतीला मद्रास उच्च न्यायालयाने जोरदार फटकारले आहे. अपंगत्व किंवा शारीरिक दुखापत ही व्यक्तीची चूक नसून, अशा कारणावरून घटस्फोट मागणे अमानुष आणि संवेदनहीन असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. (High Court)
या प्रकरणात महिलेचा लग्नापूर्वी गंभीर रस्ता अपघात झाला होता. या अपघातात तिच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली होती आणि तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. लग्नानंतर पतीने हा अपघात आपल्यापासून लपवण्यात आल्याचा आरोप करत, पत्नी शारीरिक अडचणींमुळे वैवाहिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडू शकत नसल्याचा दावा केला. त्यानंतर त्याने हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.
सुरुवातीला कौटुंबिक न्यायालयाने पतीच्या बाजूने निर्णय देत घटस्फोट मंजूर केला होता. मात्र, पत्नीने या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयात आव्हान दिले. (Divorce Case)
सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय रद्द करत पतीची याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, एखाद्या व्यक्तीला झालेली दुखापत, आजार किंवा अपंगत्व हा तिचा दोष मानता येत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीला 'क्रूरपणा' मानून घटस्फोट मागण्यास कायदेशीर आधार नाही.
न्यायालयाने पुढे नमूद केले की, विवाह म्हणजे केवळ आनंदाचे क्षण वाटून घेणे नव्हे, तर आजारपण, संकट आणि अडचणीच्या काळात एकमेकांची साथ देणे ही पती-पत्नीची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे. अशा वेळी जोडीदाराचा त्याग करणे हे भारतीय संविधानातील मानवी मूल्यांच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.






