रामपूरहाट : पश्चिम बंगाल विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) ज्येष्ठ नेते आशिष बॅनर्जी यांनी आत्महत्या केली. बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत आशिष बॅनर्जी यांचा मृतदेह आढळला. कार्यालयातून एक चिठ्ठी पण जप्त करण्यात आली आहे. ही आत्महत्या करण्याआधी आशिष बॅनर्जी यांनीच लिहून ठेवल्याचा संशय आहे. पोलीस आशिष बॅनर्जी यांच्या आत्महत्येप्रकरणी तपास करत आहेत.
चिठ्ठीतले अक्षर आशिष बॅनर्जी यांचेच आहे का हे तपासण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. पोलिसांनी बॅनर्जींचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अद्याप आशिष बॅनर्जींनी टोकाचे पाऊल उचलण्यामागचे कारण समजलेले नाही.
आशिष बॅनर्जी रामपूरहाट विधानसभा मतदारसंघातून २००१ ते २०२६ दरम्यान सलग पाच वेळा निवडून आले. ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असताना आशिष बॅनर्जी यांनी विधानसभेत उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. याआधी काही काळ ते पश्चिम बंगालमध्ये कृषिमंत्री होते. त्यांनी ममता बॅनर्जी सरकारमध्ये राहून वेगवेगळ्या खात्यांचा कारभार हाताळला होता. पण २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपच्या ध्रुबा साहा यांना एक लाख ११ हजार ९२० मते मिळाली तर आशिष बॅनर्जी यांना ८७ हजार ६८७ मते मिळाली. यामुळे २४ हजार २३३ मतांचा फटका बसला आणि आशिष बॅनर्जी यांच्या राजकीय कारकिर्दीचा वेग एकदम मंदावला. मागील काही दिवसांपासून ते पक्षाने दिलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा त्याग करून काही काळ फक्त कार्यकर्ता म्हणून काम करण्यास इच्छुक होते. यामुळेच अचानक काय घडले ज्यामुळे आशिष बॅनर्जी यांनी पक्ष कार्यालयातच टोकाचे पाऊल उलचले याचा तपास सुरू आहे.