Tuesday, September 1, 2026

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवणार?’ एकनाथ शिंदेंनी सुनावले खडे बोल

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी नवी दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी उबाठा गटावर जोरदार टीका केली.

“बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. २०१९ मध्ये त्यांच्या विचारांना, हिंदुत्वाला, जनतेच्या बहुमताला आणि पक्षाच्या घटनेला गोठवण्याचे काम झाले. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात आहे,” असा आरोप शिंदे यांनी केला. बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाची भूमिका आणि धोरण पुसण्याचे काम सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, राज्यघटना, पक्षाची घटना आणि निवडणूक आयोगाचे अधिकार हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. शिवसेनेच्या वतीने युक्तिवाद सुरू झाल्यानंतर संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली जातील, असे त्यांनी सांगितले. दिल्लीमध्ये शिवसेनेच्या राज्यप्रमुखांची बैठक होणार असून, या बैठकीत संघटनात्मक बाबींवर चर्चा करून ते मार्गदर्शन करणार असल्याचेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी सकारात्मक’

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरही शिंदे यांनी भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री असताना मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण, कुणबी प्रमाणपत्रासाठी आयोग, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज अशा योजना राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

इतर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला कायदेशीर आणि न्याय्य पद्धतीने न्याय देण्याची महायुती सरकारची भूमिका असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनीही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >