Tuesday, September 1, 2026

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

Diamond AI system : भारताच्या सुरक्षेसाठी वापरणार 'डायमंड' एआय सर्व्हेलन्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : भारतीय संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उत्पादन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला नवी दिशा देण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला आहे. भारतातील अग्रगण्य संरक्षण उत्पादन कंपनी 'आरआरपी डिफेन्स लिमिटेड'आणि जागतिक स्तरावर नावाजलेली इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टीम डेव्हलपर कंपनी 'ईएससी बाज' यांनी भारतात एका विशेष भागीदारीची घोषणा केली आहे. या करारांतर्गत इस्रायलचे जगप्रसिद्ध 'डायमंड - युनिक ऑब्झर्व्हेशन सिस्टीम'हे 'एआय' आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञान भारतात आणले जाणार आहे.

काय आहे 'डायमंड' तंत्रज्ञान?

'डायमंड' ही एक अत्यंत प्रगत आणि बुद्धिमत्ता आधारित सर्व्हेलन्स यंत्रणा आहे. या यंत्रणेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे काळ्याकुट्ट अंधारातही ही सिस्टीम 'दिवसासारखे' स्पष्ट आणि उच्च दर्जाचे दृश्य दाखवू शकते. 80 अंश अँगल आणि हाय-रिझोल्युशन: 80 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यू आणि 4240 × 2832 रिझोल्युशनसह हे तंत्रज्ञान काम करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सपोर्ट: एआयच्या मदतीने धोक्याची किंवा घुसखोरीची ओळख अत्यंत वेगाने आणि अचूकतेने केली जाते. अष्टपैलू वापर: सीमा सुरक्षा, लष्करी तळ, संवेदनशील पायाभूत सुविधा आणि तातडीच्या सुरक्षेसाठी हे तंत्रज्ञान वॉच टॉवर्ससह फिरत्या वाहनांवर सहज तैनात करता येते.

अथांग आर्थिक अन् व्यावसायिक संधी

जागतिक पातळीवर लष्करी इलेक्ट्रो-ऑप्टिकल आणि इन्फ्रारेड सर्व्हेलन्सची बाजारपेठ सध्या 11.1 अब्ज डॉलर्सच्या (अंदाजे 90,000 कोटी रुपये) घरात आहे. एकट्या भारतात या तंत्रज्ञानासाठी 580 दशलक्ष डॉलर्सची (अंदाजे 4,800 कोटी रुपये) मोठी संधी उपलब्ध आहे. आरआरपी डिफेन्सच्या प्राथमिक अंदाजानुसार, या नवीन व्यावसायिक विभागातून कंपनीच्या एकूण संभाव्य उत्पन्नात तब्बल 30 टक्के वाढ होऊ शकते.

'मेक इन इंडिया' ते 'मेक इन इंडिया, सेल टू द वर्ल्ड'

विदेशी तंत्रज्ञान आयात करण्यापुरता हा करार मर्यादित नसून, 'मेक इन इंडिया'च्या धोरणानुसार या प्रगत तंत्रज्ञानाचे भारतात उत्पादन करणे, स्थानिक पातळीवर सुधारणा करणे आणि येथून जागतिक बाजारपेठेत निर्यात करणे हे या दोन्ही कंपन्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे.

'हा करार केवळ आमच्या पोर्टफोलिओमध्ये नवीन उत्पादन जोडण्यापुरता नाही. डायमंड तंत्रज्ञानामुळे आम्हाला संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातील एका अत्यंत विशेष आणि प्रगत विभागामध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. भारतात उत्पादन करून जागतिक स्तरावर निर्यात करण्याचे आमचे स्वप्न आहे', या करारावर बोलताना आरआरपी डिफेन्सच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीमध्ये सीमा सुरक्षा आणि लष्करी तळांचे रक्षण करण्यासाठी 24 तास नजर ठेवणे ही आता गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर आरआरपी डिफेन्स आणि ईएससी बाजची ही भागीदारी भारताच्या सुरक्षिततेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >