Thursday, September 3, 2026

Tibet Earthquake : तिबेटमध्ये रिश्टर स्केलवर ५.० तीव्रतेचा भूकंप

Tibet Earthquake : तिबेटमध्ये रिश्टर स्केलवर ५.० तीव्रतेचा भूकंप

ल्हासा : तिबेटमध्ये गुरुवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.0 नोंदवण्यात आली आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण आपत्तीच्या अवघ्या एका आठवड्यानंतर हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाचे धक्के दुपारी सुमारे 1 वाजून 46 मिनिटांनी नोंदवण्यात आले. भूकंपाचा केंद्रबिंदू 31.479 अंश उत्तर अक्षांश आणि 80.370 अंश पूर्व रेखांशावर होता. भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे 14 किलोमीटर असल्याचे सांगण्यात आले आहे. भूकंपाचे ठिकाण तिबेट परिसरात नोंदवण्यात आले.सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी ग्लेशियर कोसळल्यानंतर तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर तिबेटला भीषण पुराचा फटका बसला. चीनच्या सीमेलगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे.नेपाळ-तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरानंतर तिबेटमध्ये सुमारे 100 नेपाळी नागरिक बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लोक बहादूर छेत्री यांनी ही माहिती दिली.

नेपाळमध्ये या पुरामुळे आतापर्यंत 1,200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 4,875 पेक्षा अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. पूर येऊन एक आठवडा उलटला असला तरी अनेक भागांमध्ये मदत आणि बचावकार्य अजूनही सुरू आहे.परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, रसुवा जिल्ह्यातील भोटेकोशी नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या किमान 19 जणांचे मृतदेह भारतात सापडले आहेत. हे मृतदेह भोटेकोशी नदीतून वाहत त्रिशूली आणि नारायणी नदीमार्गे भारतात पोहोचले. नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या भारतातील रुपन्देही आणि नवलपरासी पश्चिम भागात हे मृतदेह आढळले आहेत. ते नेपाळच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

प्रवक्त्यांनी सांगितले की, सुमारे 3,000 नेपाळी नागरिक व्यवसाय आणि तीर्थयात्रेसाठी तिबेटमध्ये गेले होते. मात्र, पुरामुळे ते तेथे अडकून पडले. यापैकी 2,500 हून अधिक नागरिक सुरक्षितपणे नेपाळमध्ये परतले आहेत. त्यांनी हिल्सा आणि तातोपानी सीमा चौक्यांमार्गे मायदेशी परतण्याचा मार्ग स्वीकारला, तर काही जण हवाई मार्गानेही परतले. सध्या सुमारे 1,500 नेपाळी नागरिक तिबेटमधील केरुंग सीमा भागात अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे नेपाळमध्ये परत आणण्यासाठी दोन्ही देशांचे अधिकारी चर्चा करत आहेत.26 ऑगस्ट रोजी नेपाळ-तिबेट सीमेजवळ बर्फ आणि खडकांचा मोठा भाग कोसळल्यानंतर हा भीषण पूर आला होता. या पुरामुळे नेपाळच्या उत्तर आणि मध्य भागातील अनेक शहरे आणि गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >