विरार : काळ आला होता पण वेळ आली नव्हती', या म्हणीचा जिवंत अनुभव पालघर जिल्ह्यातील विरार येथील रहिवासी प्रदीप तेंडुलकर यांनी घेतला आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेले तेंडुलकर नेपाळ आणि तिबेट सीमेवर आलेल्या भीषण महाप्रलयातून अगदी थोडक्यात बचावले आहेत. ज्या हॉटेलात ते मुक्कामी होते, तेच हॉटेल त्यांनी तिथून पाय काढल्यानंतर अवघ्या चार ते पाच तासांत पुराच्या तुफान प्रवाहात पत्त्यांसारखे वाहून गेले. सध्या ते १८,५०० फूट उंचीवर असलेल्या डोलमा ला परिसरात सुरक्षित असून त्यांचा पुढील प्रवास सुरू आहे.
एका महिलेला ३८ आठवड्यांची गरोदर असल्याचे सांगून रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुटुंबीयांच्या हातात सोनोग्राफीचे रिपोर्ट होते, ज्यानुसार बाळ पूर्ण ...
प्रदीप तेंडुलकर हे २२ ऑगस्ट रोजी विरारहून कैलास मानसरोवर यात्रेसाठी रवाना झाले होते. प्रवासादरम्यान नेपाळ-तिबेट सीमेजवळील एका हॉटेलमध्ये त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. सुदैवाने, नैसर्गिक आपत्ती येण्यापूर्वी काही तास आधीच त्यांनी ते हॉटेल सोडले आणि पुढे निघाले. त्यानंतर काही वेळातच परिसरात हिमकडे फुटल्यामुळे भोटे काशी नदीला भयंकर पूर आला. पुराच्या तीव्र लाटांनी तेंडुलकर थांबलेले ते हॉटेल क्षणार्धात गिळंकृत केले. आपण थांबलेल्या ठिकाणी आता फक्त चिखल आणि ढिगारा उरला आहे, हे समजताच तेंडुलकर यांनाही मोठा धक्का बसला. "देवकृपेने आमचा जीव वाचला, पण या जलप्रलयात स्थानिक लोकांचे झालेले अतोनात नुकसान पाहून मन सुन्न झाले आहे," अशा अत्यंत भावूक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
दुसरीकडे, नेपाळमध्ये महापुराच्या बातम्या थडकल्यानंतर विरारमध्ये राहणाऱ्या तेंडुलकर यांच्या कुटुंबाची आणि मित्रपरिवाराची चिंता प्रचंड वाढली होती. संपर्क होत नसल्याने भीतीचे वातावरण होते; मात्र प्रदीप तेंडुलकर सुरक्षित स्थळी पोहोचल्याचा संदेश मिळताच नातेवाईकांचा जीव भांड्यात पडला. या महाप्रलयात आतापर्यंत ९०० हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून, सुमारे ४ हजारांहून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत. यात शेकडो परदेशी पर्यटकांचाही समावेश आहे.
सध्या नेपाळ, भारत आणि चीनची आपत्कालीन बचाव पथके या भागात युद्धपातळीवर मदतकार्य राबवत आहेत. भूस्खलनामुळे आणि रस्ते खचल्यामुळे हजारो प्रवासी वेगवेगळ्या ठिकाणी अडकले असून, आतापर्यंत १० हजारांपेक्षा जास्त लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. नदीची पाण्याची पातळी अद्यापही धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने परिसरात अतिदक्षतेचा इशारा (High Alert) दिला आहे.






