नवी दिल्ली : रशिया (Russia) आणि युक्रेन (Ukrain) दरम्यान गेल्या काही काळापासून सुरू असलेला भीषण संघर्ष थांबवण्यासाठी भारत पुन्हा एकदा शांततेचा दूत म्हणून पुढे आला आहे. युक्रेनच्या राजधानीत म्हणजेच कीव्ह (Kyiv) येथे पोहोचलेले भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर (Dr. S. Jayshankar) यांनी गुरुवारी स्पष्ट केले की, हे युद्ध संपवण्यासाठी भारत कोणत्याही प्रकारे मदत करण्यास किंवा मध्यस्थीची भूमिका बजावण्यास पूर्णपणे तयार आहे.
महाराष्ट्राने समुद्राकडे 'विकासाचे दालन' म्हणून पाहण्याची गरज मुंबई : ८७७ किलोमीटरची किनारपट्टी, असंख्य नद्या आणि खाड्या लाभलेल्या महाराष्ट्राने ...
युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अंद्री सिबिहा (Andrii Sybiha) यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "या युद्धावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारताकडून ज्या काही प्रकारची मदत शक्य असेल, ती करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत." शांतता प्रस्थापित करण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच एकमेव मार्ग असल्याचे भारताने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे. या महत्त्वाच्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी केवळ युद्धावरच नव्हे, तर काळ्या समुद्रातील (Black Sea) व्यापारी जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या गंभीर मुद्द्यावरही सविस्तर चर्चा केली. अलिकडच्या काळात या भागातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि सागरी सुरक्षेवर मोठा परिणाम झाला आहे, ज्यावर दोन्ही देशांनी चिंता व्यक्त केली.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सध्या युक्रेन आणि पोलंडच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते युक्रेनचे परराष्ट्र मंत्री अंद्री सिबिहा आणि पोलंडचे उपपंतप्रधान राडोस्लाव सिकोर्स्की (Radoslaw Sikorski) यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करत आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याचा मुख्य उद्देश या देशांशी द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि प्रादेशिक सुरक्षेसह परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करणे हा आहे.
विशेष म्हणजे, काळ्या समुद्रात रशिया आणि युक्रेनमधील वाढत्या संघर्षात काही भारतीय खलाशांचा (seafarers) मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. भारताने सर्व खलाशांच्या आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ठामपणे मांडला असून, हिंसाचार त्वरित थांबवून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे.






