Friday, September 4, 2026

Nashik : विसापूर आश्रमशाळेतील ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, पालकांकडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप

Nashik : विसापूर आश्रमशाळेतील ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू, पालकांकडून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा आरोप

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातुन खळबळजनक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत (Government Secondary Ashram School) इयत्ता दुसरीत शिक्षण घेणाऱ्या सृष्टी ओंकार सूर्यवंशी (वय ८) या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूप्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पालकांनी शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

कळवण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टी सूर्यवंशी हिला दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी ताप व उलट्यांचा त्रास होत असल्याने प्राथमिक उपचारासाठी कळवण तालुक्यातील मोकमभणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला पुन्हा विसापूर येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत आणण्यात आले. यानंतर दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सृष्टीची प्रकृती पुन्हा बिघडल्याने तिला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळवण येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्री २.२७ वाजता तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केल्याची माहिती पोलिसांच्या आकस्मिक मृत्यू नोंदीत नमूद करण्यात आली आहे. या प्रकरणी कळवण पोलिस ठाण्यात (Kalwan Police Station) अ.मृ. नोंद क्र. ३८/२०२६ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नोंदीनुसार मृत विद्यार्थिनीचे वय ८ वर्षे असून ती सटाणा तालुक्यातील गोळवाड येथील रहिवासी होती.

आजारी असल्याची माहिती वेळेवर दिली नसल्याचा दावा

दरम्यान, शाळेतील शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांनी मुलगी आजारी असल्याची माहिती पालकांना वेळेवर दिली नाही, असा आरोप पालकांनी केला आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास फोन करून विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे आजाराची माहिती पालकांना आधी का देण्यात आली नाही, विद्यार्थिनीवर शाळेत असताना कोणते उपचार करण्यात आले आणि तिला रुग्णालयात दाखल करण्यास विलंब झाला का, असे प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.

मृत्यूचे वैद्यकीय कारण अस्पष्ट

मात्र, विद्यार्थिनीच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे केवळ पोलिसांच्या आकस्मिक मृत्यू नोंदीच्या आधारे मृत्यूचे कारण निश्चित असल्याचे सांगता येणार नाही. वैद्यकीय तपासणी, शवविच्छेदन अहवाल तसेच संबंधित वैद्यकीय कागदपत्रांमधून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणे अपेक्षित आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी, आजारी विद्यार्थ्यांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळणे आणि पालकांना तत्काळ माहिती देण्याची व्यवस्था याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाची प्रशासनाकडून सखोल चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

दरम्यान, या प्रकरणात शाळा प्रशासनाची बाजू आणि संबंधित अधिकाऱ्यांचे अधिकृत म्हणणे समोर येणे महत्त्वाचे आहे. त्यानंतरच विद्यार्थिनीला उपचार मिळण्यास विलंब झाला का किंवा प्रशासनाच्या पातळीवर काही हलगर्जीपणा झाला का, याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >