Saturday, September 5, 2026

Jalgaon : स्मार्ट मीटरने वीज बंद झाली, तरी चोरीने वापर सुरूच ! जळगावात 28 जणांवर गुन्हे

Jalgaon : स्मार्ट मीटरने वीज बंद झाली, तरी चोरीने वापर सुरूच ! जळगावात 28 जणांवर गुन्हे

Jalgaon : थकीत वीजबिलामुळे स्मार्ट मीटरद्वारे वीजपुरवठा आपोआप खंडित झाल्यानंतरही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वापर करणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने जळगाव विभागात धडक मोहीम सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्यात राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत तब्बल 28 ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले. या सर्वांविरोधात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम 135 अंतर्गत विविध पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत तब्बल 11 हजार 606 युनिट वीजचोरी उघडकीस आली असून, महावितरणचे अडीच लाखांहून अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

बिल भरलं नाही, तरी जोडली वीज

स्मार्ट मीटर बसविण्यात आलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकीमुळे ‘ऑटो डिस्कनेक्ट’ केला जातो. म्हणजेच थकीत बिलामुळे वीजपुरवठा आपोआप बंद होतो. ग्राहकाने थकीत वीजबिल भरल्यानंतर वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. मात्र, काही ग्राहकांनी बिलाचा भरणा न करताच खंडित केलेली वीजजोडणी स्वतःहून पुन्हा जोडली आणि अनधिकृतपणे वीज वापरण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात आल्यानंतर जळगाव विभाग कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली.

विशेष पथकांकडून जोडण्यांची तपासणी

ऑटो डिस्कनेक्ट झाल्यानंतर संबंधित ग्राहक प्रत्यक्षात वीजविना आहे की अनधिकृतपणे वीज वापरत आहे, याची पडताळणी करण्यासाठी महावितरणने विशेष पथके तयार केली. या पथकांनी थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या जोडण्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान 28 ग्राहकांनी बिल न भरताच अनधिकृतरीत्या वीजपुरवठा सुरू केल्याचे आढळून आले. यानंतर संबंधितांविरोधात वीज चोरीची कारवाई करण्यात आली आणि कलम 135 अंतर्गत पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले.

नशिराबादपासून जळगावपर्यंत कारवाई

वीज चोरी केल्याच्या आरोपावरुन पोलिसांत गुन्हे दाखल झालेल्यांमध्ये नशिराबाद येथील शेख इरफान शेख खलील पिंजारी, शेख अजिम शेख युसूफ यांचा समावेश आहे. भादली बुद्रुक येथील श्रीधर नारायण ठाकूर, नारायण विठ्ठल जावळे, गोपिकाबाई सखाराम पाटील, मोतीराम लक्ष्मण पाटील, शिवाजी कडू कोळी, जंगलू सुपडू सपकाळे आणि उषाबाई गणेश कोळी यांच्यावरही कारवाई करण्यात आली. डोमगाव येथील मुरलीधर गिरधर महाले व दिगंबर प्रभाकर जाधव तसेच जळगावातील प्रतिभा रितेश पवार, लक्ष्मी भानुदास बागडे, स्वप्नील प्रशांत सौंदाणे, देवीदास गणपतराव शिंदे, शेख रफिक हबीब, शाहरूख खान पठाण, संजय भगवान महाजन, अकीब शाह अब्दुल रहमान शाह, गणी चिंधा पटेल, शेख आरिफ बिस्मिल्ला, मोहंमद इरफान तांबोळी, शफी गफूर पटेल, शेख कय्युम हुसेनखा, दिलीप सूरजमल लाठी, नवीद जमील शेख, मनीषा विनोद जोशी आणि रसुबाई तुकाराम पाटील यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय साळी आणि त्यांच्या पथकाने केली.

वीज चोरीसोबत जीवितालाही धोका

थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर स्वतःहून किंवा इतरांच्या मदतीने वीज जोडणी करणे हा केवळ कायदेशीर गुन्हा नाही, तर जीवघेणाही ठरू शकतो. अनधिकृत जोडणी करताना प्राणांतिक विद्युत अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे ग्राहकांनी स्वतःहून वीज जोडणी करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे. खंडित वीजपुरवठा असलेल्या ग्राहकांना शेजारील ग्राहकांनी अनधिकृतपणे वीजपुरवठा देऊ नये, असा इशाराही महावितरणने दिला आहे. अशा प्रकारे अनधिकृत वीजपुरवठा देण्यात आल्याचे आढळल्यास संबंधित शेजारी ग्राहकाचाही वीजपुरवठा खंडित करून कायदेशीर कारवाई केली जाईल.

दरम्यान, ऑटो डिस्कनेक्शननंतर अनधिकृतरीत्या वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर यापुढेही विशेष पथकांच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. थकबाकीदार ग्राहकांनी आपली वीजबिले तातडीने भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >