Saturday, September 5, 2026

Kerala Thrissur Car Accident : अंधार, अतिवेग अन् रस्त्यावरील निष्काळजीपणा! त्रिशूरमधील अपघातात तमिळनाडूच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

Kerala Thrissur Car Accident : अंधार, अतिवेग अन् रस्त्यावरील निष्काळजीपणा! त्रिशूरमधील अपघातात तमिळनाडूच्या ८ विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत

त्रिशूर : मध्य केरळमधील त्रिशूर (Keral, Thrissur) जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर शुक्रवारी रात्री उशिरा एक अत्यंत भीषण अपघात घडला. महामार्गावर नियमबाह्यपणे उभ्या केलेल्या एका ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तमिळनाडूच्या दिंडीगुल येथील अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) शिक्षण घेणाऱ्या ८ विद्यार्थ्यांचा जागीच व उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात आणि विद्यार्थ्यांच्या गृहनगरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रस्ता दुभाजक आणि वळणावर घडला भीषण अपघात

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी रात्री ११.४० वाजताच्या सुमारास कैपमंगलम येथील पनामबिक्कुन्नू भागात झाला. अपघातग्रस्त विद्यार्थी गुरुवायूरकडून कोडुंगलूरच्या दिशेने कारने चालले होते. या भागात राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक एका बाजूने वळवण्यात आली होती. मात्र, त्याच वळणावर रस्त्याच्या उजव्या बाजूला एक महाराष्ट्राच्या पासिंगचा (Maharashtra-registered) ट्रक बेकायदेशीरपणे उभा करून ठेवला होता.

अतिवेग आणि अंधारामुळे चालकाचे नियंत्रण सुटले

पोलीस एफआयआर (FIR) नुसार, विद्यार्थ्यांची कार अत्यंत वेगात होती. अंधार आणि अचानक आलेल्या डायव्हर्शनच्या (वाहतूक वळवण्याच्या) बॅरिकेट्समुळे चालकाला पुढे उभा असलेला ट्रक वेळेत दिसला नाही. त्यामुळे कोणतीही ब्रेक लावण्याची संधी न मिळता कार थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सहा मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली

अपघातात प्राण गमावलेले सर्व तरुण दिंडीगुल येथील एकाच अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठपैकी सहा मृत विद्यार्थ्यांची नावे स्पष्ट झाली आहेत. यामध्ये सूर्या, युवसंजित, विश्व आणि जोशुआ हे दिंडीगुलचे रहिवासी होते, तर संतोष आणि प्रसन्ना हे मदुराई येथील रहिवासी होते. उर्वरित दोन मृत विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत.

स्थानिक आणि प्रशासनाकडून बचावकार्य

अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक तात्काळ मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि कैपमंगलम पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. कारचा चक्काचूर झाल्यामुळे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी त्रिशूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत.

ट्रक चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

या प्रकरणी कैपमंगलम पोलिसांनी कठोर कारवाई करत ट्रक चालकाविरोधात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०५ नुसार 'सदोष मनुष्यवध'चा गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर घाबरलेला ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातस्थळी सापडलेल्या ओळखपत्रांवरून पोलिसांनी मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधला. अचानक मिळालेल्या या बातमीने पालकांना मोठा धक्का बसला असून, आपले मुलगे केरळला गेले आहेत याची कल्पनाही काही पालकांना नव्हती. नातेवाईक त्रिशूरला पोहोचल्यानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करून ते त्यांच्या ताब्यात दिले जातील.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >