Saturday, September 5, 2026

Nepal Flood : महापुराचं थैमान ! 275 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता, मृतांची संख्या 1344 वर

Nepal Flood : महापुराचं थैमान ! 275 भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता, मृतांची संख्या 1344 वर

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर (Nepal-Tibet Border) २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भीषण ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या महापुरामुळे मोठं संकट निर्माण झालं आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक जण अडकले असून, भारतीय नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत १६६ भारतीय नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र, तब्बल २७५ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, चीनच्या तिबेट स्वायत्त क्षेत्रात अडकलेल्या १,९०७ भारतीय नागरिकांनी सुरक्षितपणे नेपाळच्या हद्दीत प्रवेश केला आहे. (Nepal Flood Update)

महापुरात मृतांचा आकडा १,३४४ वर

या महापुराची भीषणता यावरूनही स्पष्ट होते की, नेपाळी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत १,३४४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. मात्र, संकट अद्याप टळलेलं नाही. सुमारे ५ हजार नागरिक बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. (Nepal Flood Update)

भारताकडून नेपाळला मोठी मदत

या संकटाच्या काळात भारताने नेपाळच्या (Nepal) मदतीसाठी मोठं पाऊल उचललं आहे. भारताकडून आतापर्यंत सुमारे ९५ टन मदत आणि वैद्यकीय साहित्य नेपाळला पाठवण्यात आलं आहे.याशिवाय, नेपाळच्या विनंतीवरून भारताने ५४ तज्ज्ञांचं विशेष पथक पाठवलं आहे. यामध्ये ३० बोगदा बचाव तज्ज्ञ, १९ फॉरेन्सिक तज्ज्ञ (Forensic expert) आणि ५ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Randhir Jaiswal) यांनी सांगितले की, “आमच्या माहितीनुसार २७५ भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. आम्ही नेपाळ सरकारशी सतत संपर्कात असून परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहोत. चीनमधील तिबेट भागात आता कोणताही भारतीय नागरिक अडकलेला नाही, याची चिनी अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे.” (Nepal Flood Update)

बचावकार्यात भारतीय पथकांचं योगदान

दरम्यान , बचावकार्यात अतिरिक्त फॉरेन्सिक किट्स (Forensic kits), बेली ब्रिज आणि इतर आवश्यक साहित्यही नेपाळला पाठवण्यात येणार आहे. भारतीय बचाव आणि वैद्यकीय पथकं सध्या नेपाळच्या स्थानिक प्रशासनासोबत प्रत्यक्ष घटनास्थळी काम करत असून, बेपत्ता नागरिकांचा शोध आणि बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. दरम्यान, २७५ भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता असल्याने त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. भारतीय आणि नेपाळी प्रशासनाकडून बचावकार्य आणि शोधमोहीम वेगाने सुरू आहे

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >