Tuesday, September 8, 2026

Maharashtra Weather : उघडीप की भयंकर संकट? महाराष्ट्रातील हवामानाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट

Maharashtra Weather : उघडीप की भयंकर संकट? महाराष्ट्रातील हवामानाबाबत समोर आली सर्वात मोठी अपडेट

मुंबई: ऑगस्ट महिन्यानंतर सप्टेंबरमध्येही महाराष्ट्रात पावसाची कमतरता जाणवत आहे. सध्या राज्यात मोठ्या पावसासाठी अनुकूल अशी ठोस हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज आहे. अनेक भागांत उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी आकाश ढगाळ राहू शकते. तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. (Maharashtra Monsoon)

कोकण विभागात हलक्या सरींची शक्यता 

कोकणातील पालघर, मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात. ठाणे, रायगड आणि रत्नागिरीमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. मात्र, या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही पावसाचा अलर्ट देण्यात आलेला नाही. 12 सप्टेंबरच्या आसपास हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस आणि वाऱ्याची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान अंशतः ढगाळ किंवा कोरडे राहू शकते.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे, नगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत दमट, उष्ण आणि ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात. मात्र, घाट परिसरासाठीही सध्या कोणताही अलर्ट नाही. ( Maharashtra weather)

दोन दिवसानंतर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता 

मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये तुरळक ठिकाणी सरी पडण्याची शक्यता असली तरी सर्वदूर पावसाचा अंदाज नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. 11 सप्टेंबरनंतर या भागातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि वाशिममध्ये 9 सप्टेंबर रोजी कोणताही पावसाचा अलर्ट नाही. पुढील 1 ते 2 दिवस परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता असून त्यानंतर काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो.

एकंदरीत, राज्यात सध्या पावसाने उघडीप घेतली असून पुढील काही दिवस मोठ्या पावसाची शक्यता कमी आहे. 11 सप्टेंबरनंतर हवामानात बदल होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष पुढील हवामान अंदाजाकडे लागले आहे. ( Weather Update)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >