स्थायी समिती अध्यक्षांनी दिले निर्देश, नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केली मागणी
मुंंबई ( विशेष प्रतिनिधी) : श्री गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले असताना, गणेशमूर्तींच्या आगमन व विसर्जन मार्गावर झाडांच्या फांद्यांची योग्य प्रकारे छाटणी झाली नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे हा प्रकार गंभीर असून गणेश आगमन आणि विसर्जन मार्गावरील सर्व झाडांच्या फांद्यांची छाटणी ५० उंची पर्यंत त्वरीत करण्यात यावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी दिले
भाजपचे नगरसेवक व स्थायी समिती सदस्य तेजिंदर सिंग तिवाना यांनी स्थायी समिती आजच्या सभेत हरकतीचा मुद्दा उपस्थित करत, आगमन आणि विसर्जन मार्गावरील दोन्ही बाजूंच्या झाडांच्या फांद्या किमान ५० फूट उंचीपर्यंत त्वरित छाटण्याचे निर्देश प्रशासनाला द्यावेत, अशी आग्रही मागणी केली.
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. सप्टेंबर महिन्यातही अनेक भागांत अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे ...
परळसह मुंबईतील विविध कार्यशाळांमधून सार्वजनिक गणेशोत्सवासाठी उंच मूर्ती मंडपात नेण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, मार्गातील झाडांच्या अस्ताव्यस्त फांद्या आणि लटकणाऱ्या केबल्समुळे या आगमनात मोठे अडथळे निर्माण होत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये, उंच गणेशमूर्ती नेताना मंडळांचे स्वयंसेवक मूर्तीच्या मागे उभे राहून किंवा इमारतींमधील नागरिक गॅलरीतून काठ्यांच्या साहाय्याने फांद्या व केबल्स वर उचलून मार्ग मोकळा करत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे, याकडे तिवाना यांनी समितीचे लक्ष वेधले.
"मुंबई महानगरपालिका दरवर्षी आगमन व विसर्जनाची व्यवस्था चोख बजावते. परंतु, यंदा झाडांच्या फांद्या योग्य रीतीने न छाटल्यामुळे स्वयंसेवकांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. श्री गणरायाचे आगमन आणि विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी प्रशासनाने सतर्क राहणे गरजेचे आहे," असे तेजिंदर सिंग तिवाना यांनी नमूद केले. या समस्येचे गांभीर्य ओळखून स्थायी समिती अध्यक्षांनी प्रशासनाला तातडीने निर्देश द्यावेत आणि आगमन-विसर्जन मार्गावरील झाडांची ५० फुटांपेक्षा जास्त उंचीपर्यंत योग्य छाटणी करून मार्ग अडथळामुक्त करावा, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.





