Thursday, September 10, 2026

हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आई-वडील चक्क भिकारी बनले अन् पुढे ....

हरवलेल्या मुलांना शोधण्यासाठी आई-वडील चक्क भिकारी बनले अन् पुढे ....

गुजरात : मुलांसाठी आई-वडील कोणत्याही थराला जाऊ शकतात, याचा प्रत्यय देणारी एक भावूक आणि फिल्मी वाटावी अशी घटना गुजरातमधून समोर आली आहे. दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या दोन मुलांचा शोध घेण्यासाठी आई-वडिलांनी चक्क भिकाऱ्यांचा वेष धारण केला. मुलांच्या शोधात हे दाम्पत्य गुजरातपासून महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेशापर्यंत भटकत राहिलं. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आलं आणि दोन्ही मुलं सापडली.

खेळायला गेले अन् पुन्हा घरी परतलेच नाहीत

मूळचे बिहारचे असलेले हे कुटुंब कामाच्या शोधात गुजरातमधील कच्छच्या मुंद्रा येथे वास्तव्यास होते. दाम्पत्याला राहुल (१४) आणि अर्पित (११) अशी दोन मुलं आहेत. एके दिवशी दोन्ही भाऊ खेळण्यासाठी घराबाहेर पडले. मात्र, त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. आई-वडिलांनी नातेवाईक, मित्र आणि परिसरात सर्वत्र मुलांचा शोध घेतला. मात्र, कोणताही ठावठिकाणा न लागल्याने अखेर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू करण्यात आला. मात्र, अनेक दिवस उलटूनही दोन्ही मुलांचा काहीच पत्ता लागला नाही. दरम्यान, मुलांचं अपहरण करून त्यांना भिकारी बनवणाऱ्या टोळीच्या ताब्यात दिलं असावं, असा संशय आई-वडिलांना आला. त्यानंतर त्यांनी स्वतःच मुलांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

नोकरी सोडली अन भिकाऱ्यांचा वेष घेतला

मुलांना शोधण्यासाठी या दाम्पत्याने आपलं कामधंदाही बाजूला ठेवला. भिकाऱ्यांचा वेष धारण करून ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये फिरू लागले. गुजरात, महाराष्ट्र, गोवा, राजस्थान आणि मध्य प्रदेशात त्यांनी रात्रंदिवस मुलांचा शोध घेतला. कुठे मुलगा दिसतोय का, यासाठी ते भिकाऱ्यांच्या गर्दीतही मुलांचे चेहरे शोधत राहिले. शोध घेत असताना राहुल बिहारमधील भागलपूरमध्ये भिक मागताना असल्याची माहिती त्यांना मिळाली. आई-वडील तातडीने भागलपूरला पोहोचले. भिक मागत असताना राहुल त्यांना दिसला. मात्र, आई-वडिलांना पाहताच त्याने तेथून पळ काढला. त्यामुळे मुलगा पुन्हा हातातून निसटल्याने दाम्पत्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं.

अखेर बिकारनेरमध्ये राहुल सापडला

मात्र, आई-वडिलांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा शोधमोहीम सुरू ठेवली. अखेर राहुल बिकारनेरमध्ये सापडला. राहुल सापडल्यानंतरही दाम्पत्याचा शोध थांबला नाही. आता त्यांना आपल्या दुसऱ्या मुलाचा, अर्पितचा शोध घ्यायचा होता. राहुल सापडल्यानंतर तब्बल १५ दिवसांनी अर्पितचा पश्चिम बंगालमध्ये शोध लागला. दोन मुलांसाठी आई-वडिलांनी केलेल्या या संघर्षाचा शेवटी सुखद शेवट झाला. मुलं पुन्हा मिळाल्याने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुलांच्या शोधासाठी आई-वडिलांनी भिकाऱ्यांचा वेष धारण करून पाच राज्यांत केलेली भटकंती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >