मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) प्रसिद्ध वाराणसी येथील 'स्वरवेद महामंदिर धाम'ची (Swarved Mahamandir Dham) सुमारे १२० फूट उंच आणि पर्यावरणपूरक प्रतिकृती यंदा भिवंडीतील गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. भिवंडीतील 'धामणकर नाका मित्र मंडळ' आयोजित ३८ व्या सार्वजनिक गणेशोत्सवात हा भव्य देखावा भाविकांना पाहायला मिळणार आहे.
'धामणकर नाका मित्र मंडळ' आणि 'स्वाभिमान सेवा संस्था' यांच्या संयुक्त विद्यमाने या गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत यंदाच्या विविध उपक्रमांची घोषणा केली. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवात सर्वधर्मीय नागरिकांना एकत्र आणण्यासाठी धार्मिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठी मालिका आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मंदिराची ही भव्य प्रतिकृती बनवण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर न करता लाकूड, बांबू, दोरी आणि कापड यांसारख्या पूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर केला जाणार आहे.
आरोग्य आणि सामाजिक उपक्रम
नागरिकांच्या कल्याणासाठी गणेशोत्सवाच्या काळात विविध मोफत आरोग्य शिबीरे आयोजित केली जाणार आहेत. यामध्ये रक्तदान शिबीर, डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आणि क्षयरोग (टीबी) तपासणीचा समावेश असेल. तसेच, दुर्मिळ नाणी आणि प्राचीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नागरिकांसाठी मोफत खुले राहील. पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी लंगडी, लागोरी आणि आबाधुबी यांसारख्या स्पर्धा रंगणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आवड निर्माण करण्यासाठी शाडूच्या मातीपासून मूर्ती बनवण्याची स्पर्धा पार पडली, ज्यामध्ये २२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. याशिवाय, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा तसेच दशावतार आणि नृत्य-नाटिकांचे आयोजन केले जाईल. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी मोफत शिवणकामाच्या मशीनचे वाटप केले जाणार असून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती कार्यक्रम घेतले जातील. तरुणांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी 'नशा मुक्त महाराष्ट्र' संकल्पनेवर आधारित 'सेल्फी पॉइंट' उभारला जाणार आहे. तसेच, ४३ भजन मंडळांच्या सहभागातून भक्तिमय भजनांचे कार्यक्रम रंगतील.
साडेपाच लाखांपेक्षा जास्त रकमेची बक्षिसे
गेल्या २३ वर्षांपासून सुरू असलेल्या 'स्वाभिमान श्री गणेश दर्शन स्पर्धेचा' यंदा विस्तार करण्यात आला आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच यंदा घरगुती गणेशोत्सवासाठीही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या देखाव्यांसाठी या स्पर्धेत एकूण ५.५५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील. तर क्रीडा स्पर्धांसाठी १.२५ लाख रुपयांची स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
सुरक्षेसाठी कडक व्यवस्था आणि डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ५० सुरक्षा रक्षक तैनात केले जातील आणि संपूर्ण परिसरावर ५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत डीजे (DJ) न वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला असून, पारंपरिक वाद्यांच्या गजरातच बाप्पाला निरोप दिला जाईल.