मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागण्यांवर अद्याप तोडगा न निघाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देण्याची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून १५ सप्टेंबरला मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार असून, १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात उपोषण सुरू करण्यात येणार आहे. आंदोलनाच्या मार्गावर बीडच्या पाटोदा, अहिल्यानगरमधील श्रीगोंदा, पुण्यातील हडपसर आणि रायगडमधील खोपोली येथे मोर्चाचे मुक्काम असणार आहेत.
मराठा-कुणबी दाखले रद्द होत असल्याचा आरोप करीत जरांगे पाटील यांनी विविध मागण्यांसाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा शनिवारी १५ वा दिवस आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येऊन उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यापूर्वीच दिला होता. आंदोलनावर अद्याप तोडगा न निघाल्याने त्यांनी आता मुंबईतील आंदोलनाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटी येथून मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होईल. त्याच दिवशी बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे पहिला मुक्काम असेल. १६ सप्टेंबरला अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे दुसरा मुक्काम, १७ सप्टेंबरला पुण्यातील हडपसर येथे तिसरा, तर १८ सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे चौथा मुक्काम होणार आहे. त्यानंतर १९ सप्टेंबरपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली जाणार आहे.
यापूर्वीही जरांगे पाटील यांनी मुंबईत मोठे आंदोलन केले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांनी ते आंदोलन मागे घेतले होते. आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न घेऊन जरांगे पाटील मुंबईत दाखल होणार आहेत. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. सरकारला त्यांच्या सर्व मागण्या मान्य असल्याचे सांगत लाड यांनी जरांगे यांनी उपोषण सोडावे, अशी विनंती केली होती. मात्र, या मागण्यांवर अद्याप ठोस तोडगा न निघाल्याने जरांगे यांचे उपोषण सुरूच आहे. त्यामुळे १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाबाबत सरकारची भूमिका काय राहते आणि त्यावर तोडगा कधी निघतो, याकडे आता लक्ष लागले आहे.
मुंबई: रविवारी अर्थात उद्या घराबाहेर पडण्याआधी एकदा ही आवश्य बातमी वाचा. मुंबईकरांची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला ...
गणेशोत्सवात आंदोलन करू नका – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
गणेशोत्सव काळात मुंबईत आंदोलन करणे हे मुंबईकर आणि राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी कठीण आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. राज्यातील सर्व आंदोलकांना विनंती राहील की, या काळात कुणी मुंबईत आंदोलन करणे राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. इतिहासात कधी न झालेले निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी घेतले आहेत. त्यामुळे या नेत्यांवर करण्यात येणारी टिप्पणी महाराष्ट्राला आणि समाजाला पटत नाही. मराठा समाजाला दिलेला न्याय हा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या काळात मिळाला आहे. आंदोलकांना विनंती राहील की, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत आंदोलन करणे योग्य नाही, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.






