मुंबई: दिशा सालियनच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाच्या नव्याने सुरू झालेल्या तपासाची दिशा आता महत्त्वाच्या व्यक्तींच्या चौकशीकडे केंद्रीत होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात नव्याने एफआयआर दाखल केला असून, दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा सात पानी जबाबही नोंदविण्यात आला आहे. या जबाबातील माहितीच्या आधारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, डिनो मोरिया आणि रिया चक्रवर्ती यांच्या चौकशीची मागणी सीबीआयकडून केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे सतीश सालियन यांचा जबाब या तपासातील महत्त्वाचा टप्पा ठरण्याची शक्यता आहे.
US Ambassador Sergio Gor : 'लालबागच्या राजा'च्या दरबारी अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर; दर्शन घेत म्हणाले, "येथील ऊर्जा आणि उत्साह अद्भुत!"
मुंबई : गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर भारतातील अमेरिकेचे राजदूत (Ambassador of the United States of America ) सर्जिओ गोर (Sergio Gor) यांनी मुंबईतील प्रसिद्ध 'लालबागच्या राजा'च्या (Lalbuagcha Raja ...
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 'एफआयआर' दाखल
दिशा सालियनच्या मृत्यूची नव्याने चौकशी करावी आणि तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर न्यायालयाने २ सप्टेंबर २०२६ रोजी सीबीआयला नव्याने एफआयआर दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार १४ सप्टेंबरला सतीश सालियन यांचा जबाब नोंदवून सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. एफआयआर तीन पानी असून, सतीश सालियन यांचा जबाब सात पानी असल्याची माहिती समोर आली आहे. या एफआयआरची प्रत उच्च न्यायालयात सादर केली जाणार आहे.
या तपासात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह दिनो मारिया आणि रिया चक्रवर्ती यांच्या चौकशीची मागणी सीबीआयकडून केली जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आहे. मात्र, या व्यक्तींविरुद्ध कोणतेही आरोप सिद्ध झाले आहेत, असे यातून स्पष्ट होत नाही. तपासादरम्यान उपलब्ध होणारे पुरावे आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच पुढील दिशा निश्चित होणार आहे.
सतीश सालियन यांचा जबाब ठरणार 'टर्निंग पॉईंट'
दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू झाला. दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूच्या घटनांमुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. मात्र, दिशाच्या कुटुंबीयांनी त्यावेळी या मृत्यूचे राजकीयीकरण करू नये, असे आवाहन केले होते.
दरम्यान, २०२२ मध्ये दिशा सालियनच्या मृत्यूचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता. भाजपचे आमदार विद्यमान मंत्री नितेश राणे आणि शिवसेनेचे आमदार विद्यमान मंत्री भरत गोगावले यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. या मुद्द्यावरून सभागृहात गोंधळही झाला होता. नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या नार्को चाचणीची मागणी केली होती. त्यानंतर २२ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने एसआयटीची स्थापना केली होती.
दिशाच्या मृत्यूबाबत विविध दावे आणि प्रश्न उपस्थित होत असताना, जुलै २०२५ मध्ये पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिशाने आत्महत्या केल्याचे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेला नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर २० मार्च २०२५ रोजी सतीश सालियन यांनी दिशावर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी उच्च न्यायालयात केली होती. या दाव्यांची सत्यता तपासणे हा आता नव्या तपासाचा भाग असणार आहे.
नव्या एफआयआरनंतर तपास यंत्रणा घटनाक्रम, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांचा नव्याने तपास करणार आहे. सतीश सालियन यांनी न्यायालयात केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा सात पानी जबाब तपासासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. या जबाबातील माहिती आणि त्याला पुष्टी देणारे पुरावे तपासात समोर येतात का, यावर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे.