Wednesday, September 16, 2026

Ritu Tawde : महापौर निवासस्थानी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला भावपूर्ण निरोप

Ritu Tawde : महापौर निवासस्थानी पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाला भावपूर्ण निरोप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : श्रीगणेशोत्सव अंतर्गत, दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तीमय वातावरणात बुधवारी १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी निरोप देण्यात आला. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी अर्थात महापौर बंगल्यावरही भक्तिभावाने आणि पर्यावरण रक्षणाचा संवेदनशील संदेश देत मूर्ती विसर्जन संपन्न झाले. (Ritu Tawde)

परंपरेला निसर्गस्नेही जोड देत कृत्रिम जलकुंभात श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करून महापौरांनी स्वतः सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. महापौर निवासस्थानी विराजमान झालेली मूर्ती पूर्णपणे शाडूच्या मातीची होती. निवासस्थानाच्या आवारातच तयार केलेल्या कृत्रिम जलकुंभामध्ये या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. विशेष म्हणजे, विसर्जनानंतर विरघळलेली पवित्र शाडूची माती आणि पाणी हे महापौर बंगल्यातील उद्यानात रोपांना, झाडांना दिले जाणार आहे. लाडक्या बाप्पाची मूर्ती मातीतून आकाराला येते आणि पुन्हा निसर्गातच विलीन होते; त्यामुळे या पवित्र मातीच्या रूपाने बाप्पा वर्षभर निसर्गाच्या पाना-फुलांतून आपल्यासोबत राहील, अशी भावना या विसर्जनावेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी व्यक्त केली. (Ritu Tawde)

"शब्दांपेक्षा कृतीतून दिलेला संदेश अधिक प्रभावी असतो," असे नमूद करत महापौरांनी मुंबईकरांना पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन केले. मुंबईतील समुद्र किनारे, चौपाट्या आणि नैसर्गिक तलाव हे आपले वैभव आहेत. त्यांचे रक्षण करणे हीच बाप्पाच्या चरणी खरी सेवा आहे. मुंबई महानगरपालिकेने जागोजागी कृत्रिम तलावांची उत्तम व्यवस्था केली आहे. नागरिकांनी मूर्ती विसर्जन या कृत्रिम तलावांमध्ये करावे, असे कळकळीचे आवाहन महापौर तावडे यांनी सर्व मुंबईकरांना केले आहे. (Ritu Tawde)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >