Maharashtra weather : महाराष्ट्रात सप्टेंबरच्या मध्यातही पावसाची उघडीप कायम असल्याचे चित्र आहे. मागील काही दिवस बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे काही भागांत पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता पुन्हा पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. 16 सप्टेंबर रोजी राज्यातील बहुतांश भागांत कोणताही हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत 16 सप्टेंबरला पावसाचा कोणताही अलर्ट नाही. या भागात हवामान कोरडे, दमट आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसही मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याने कोकणात पावसाची उघडीप कायम राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकच्या घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकच्या इतर भागांतही हलक्या पावसाचा अंदाज आहे. मात्र, या जिल्ह्यांनाही कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे. या ...
अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी पडू शकतात. काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असली तरी अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा उन्हाचा चटका जाणवू शकतो. पुढील 4 दिवस या भागातही कोणताही पावसाचा अलर्ट नाही.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात, मात्र जोरदार पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे खरीप पिकांसाठी आवश्यक पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही 16 सप्टेंबरला कोणताही अलर्ट नाही. बहुतांश भागांत कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शनिवारपासून राज्यातील काही भागांत परतीच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी दिवसांत हवामानात पुन्हा बदल होतो का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.






