सातारा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्या 'दरे' या मूळ गावी पोहोचलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजकीय विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. मी गावी आलो, दिल्लीला गेलो किंवा लंडनच्या दौऱ्यावर गेलो, तरी विरोधकांच्या पोटात उगाचच दुखायला लागते. त्यामुळे आता या राजकीय 'पोटदुखी'वर औषध म्हणून एखादे झाड शोधावे लागेल किंवा त्यांना थेट 'जमाल गोटा'च द्यावा लागेल, अशा शब्दांत त्यांनी फिरकी घेतली. टीका टिप्पणीला आरोपांनी नव्हे, तर प्रत्यक्ष काम करूनच उत्तर देणे योग्य ठरेल, कारण मी केवळ कामाचा माणूस आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मी कोणत्याही कारणाने नाराज नसून केवळ सणाच्या निमित्ताने गावी आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडचिरोली : गडचिरोली-चामोर्शी मार्गावर शिवणी (Gadchiroli Bus Accident) नदीच्या पुलाजवळ एसटी बसचा एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला आहे. गडचिरोली डेपोतून पोटेगावच्या ...
जागतिक बांबू लागवड दिनाचे औचित्य साधून शिंदेंनी आपल्या शेतात बांबूची लागवड केली. याप्रसंगी बोलताना त्यांनी बांबूच्या वाढत्या महत्त्वाची माहिती दिली. बांबूचा उपयोग आता केवळ साध्या वस्तूंसाठी उरलेला नसून त्यापासून इथेनॉल निर्मिती, विमानतळांचे बांधकाम आणि इतर अनेक उपयुक्त वस्तू बनविल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बांबूच्या लागवडीवर विशेष लक्ष केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. शिंदेंनी आपल्या शेतात कृषी क्षेत्रातील नवनवीन प्रयोग केले असून, त्यात सफरचंद आणि ब्ल्यू बेरीच्या यशस्वी उत्पादनानंतर आता कापूर आणि हिंगाच्या रोपांची नवीन लागवड केली आहे. विशेष म्हणजे, आजवर परदेशातून आयात करावी लागणारी ब्ल्यू बेरी आता महाराष्ट्राच्या मातीत पिकवता येऊ शकते, हे त्यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.
राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर बोलताना त्यांनी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. ज्या भागात पावसाच्या ओढीमुळे किंवा दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे आणि पिके करपून गेली आहेत, तिथे तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री सध्या या बाधित क्षेत्रांची पाहणी करत असून, आपण स्वतः लवकरच या दुष्काळी भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.





