- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मांडणार 'रिपोर्ट कार्ड'; पक्षीय कामात उदासीनता दाखवणाऱ्यांचे कान टोचणार
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या सोमवारी (२२ जून) सायंकाळी सात वाजता आपल्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्र्यांसमोर सर्व आमदारांचे 'रिपोर्ट कार्ड' (कामगिरीचा ताळेबंद) मांडणार आहेत. विशेष म्हणजे, अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना अनेक आमदार सभागृहात पूर्णवेळ उपस्थित राहत नसल्याची गंभीर दखल पक्षनेतृत्वाने घेतली असून, अशा आमदारांचे या बैठकीत कान टोचले जाणार आहेत.
पक्षपातळीवरून दिल्या गेलेल्या अनेक महत्त्वाच्या उपक्रमांकडे आणि संघटनात्मक जबाबदाऱ्यांकडे अनेक आमदार दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये प्रामुख्याने 'एसआयआर' मोहीम तसेच बूथ प्रमुखांच्या (बीएल-२) नियुक्त्या करण्याकडे अनेक आमदार आणि काही खासदारांनीही पाठ फिरवली आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाचा अत्यंत महत्त्वाचा आणि थेट जनतेशी जोडणारा उपक्रम असलेल्या पंतप्रधानांच्या 'मन की बात' कार्यक्रमाच्या स्थानिक आयोजनातही अनेक आमदारांनी प्रचंड उदासीनता दाखवल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व बाबींचा लेखाजोखा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तयार केला असून तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाणार आहे.
पूर्णवेळ उपस्थित न राहणाऱ्यांना मिळणार तंबी
अधिवेशनादरम्यान आमदारांची सभागृहातील उपस्थिती अनिवार्य असते. मात्र, अनेक आमदार केवळ हजेरी लावून किंवा ठरावीक वेळेतच सभागृहात थांबत असून पूर्णवेळ बसत नसल्याचे पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आले आहे. आगामी काळात मतदारसंघात पक्ष टिकवून ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींची ही अशी वृत्ती पक्षाला परवडणारी नाही, हाच मुख्य संदेश या बैठकीतून दिला जाणार आहे. त्यामुळे 'वर्षा'वरील या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस आमदारांची नेमकी कशी 'शाळा' घेतात, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






