Tuesday, September 1, 2026

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

Mumbai Trees Damaged by Cables : टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सचा झाडांना विळखा

तातडीने उपाययोजना राबवून कारवाई करण्याची वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मागणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत सध्या इंटरनेट, ऑप्टीकल फायबर केबल्स तसेच ब्राँडब्रँड आणि केबल्स टिव्हीच्या लोंबकळणाऱ्या केबल्समुळे शहरात विद्रुप दर्शन होत असतानाच आता या केबल्सने थेट झाडांना विळखा घातल्याने या सर्व केबल्स त्वरीत हटवण्याची मागणी वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत करण्यात आली आहे. भाजपचे नगरसेवक अॅड सिध्दार्थ शर्मा यांनी प्राधिकरणाच्या बैठकीत झाडांना विळखा घालणाऱ्या या केबल्सबाबत तीव्र नाराजी प्रशासनाकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे झाडांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

भाजप नगरसेवक ऍड सिध्दार्थ शर्मा यांनी झाडांवर इंटरनेट, ऑप्टीकल फायबर केबल्स, ब्रॉडब्रँड तसेच केबल्स टिव्ही आदी कंपन्यांकडून केबल्स बांधणे, झाडांच्या खोडाभोवती गुंडाळणे अथवा झाडांचा आधार म्हणून वापर करण्याच्या वाढत्या प्रकारांविरोधात मंगळवारी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे तीव्र आक्षेप नोंदविला.

“मुंबईतील झाडे ही कोणत्याही खाजगी टेलिकॉम किंवा केबल्स कंपनीची मालमत्ता नाहीत आणि ती युटीलिटीज पोल्स हेही नाहीत. डिजिटल कनेक्टीव्हीटी आवश्यक आहे; मात्र मुंबईच्या झाडांचा बळी देवून डिजिटल विकास होऊ शकत नाही,” असे अॅड. शर्मा यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील विविध भागांमध्ये झाडांच्या खोडाभोवती केबल्स घट्ट गुंडाळणे, फांद्यांना केबल्स बांधणे, फांद्यांवर वायर लटकविणे तसेच खिळे, स्क्रू, क्लॅम्प किंवा इतर साधनांच्या माध्यमातून केबल्स झाडांना जोडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. यामुळे झाडांच्या सालीचे नुकसान, नैसर्गिक वाढीस अडथळा, गर्डलिंग, फांद्या कमकुवत होणे तसेच झाडांच्या छाटणी व देखभालीच्या कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या ‘वृक्ष संजीवनी अभियान’च्या माध्यमातून शहरातील झाडांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे टेलिकॉम आणि केबल्स कंपन्यांकडून झाडांचा पायाभूत सुविधांसाठी आधार म्हणून वापर होणे ही गंभीर विसंगती आहे, असेही अॅड. शर्मा यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संपूर्ण मुंबईत ट्री अँड केबल ऑडीट राबवण्याची मागणी ऍड शर्मा यांनी केली. या सर्वेक्षणामध्ये झाडांवर असलेल्या या संबंधित केबल्सची माहिती, आवश्यक महापालिका परवानग्या तसेच एनओसीची तपासणी आणि झाडांना हानी पोहोचवणाऱ्या केबल्सची ओळख करण्यात यावी,अशी मागणी त्यांनी केली. तसेच अनधिकृत केबल्स तातडीने हटविणे अथवा सुरक्षित पद्धतीने स्थलांतरित करणे आणि वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑपरेटरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

‘वृक्ष संजीवनी – केबल्स फ्रि ट्रीचा ’ प्रायोगिक तत्वावरील मोहिमेअंतर्गत प्रभागातील सर्व सार्वजनिक झाडांचे सर्वेक्षण करून झाडांना बांधलेल्या अथवा झाडांच्या आरोग्यास हानीकारक असलेल्या केबल्सची ओळख पटवून घ्यावी आणि संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून त्या हटविणे अथवा स्थलांतरित करण्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याचा प्रायोगिक तत्वावरील मोहिम यशस्वी झाल्यानंतर ती संपूर्ण मुंबईत राबविता येईल, असा प्रस्तावही अॅड. शर्मा यांनी मांडला. याचा अहवाल ३० दिवसांच्या आत अथवा मुंबई वृक्ष प्राधिकरणाच्या पुढील बैठकीपूर्वी अॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.या अहवालामध्ये किती झाडांचे सर्वेक्षण करण्यात आले, किती झाडांवर केबल्स आढळल्या, किती केबल्स हटविण्यात किंवा स्थलांतरित करण्यात आल्या आणि संबंधित कंपन्यांवर कोणती कारवाई करण्यात आली, याचा सविस्तर तपशील देण्यात यावा, अशी मागणी अॅड. शर्मा यांनी केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >