Friday, September 4, 2026

A second life : अंधार, चिखल अन् 'हरे कृष्ण'चा जप! बोगद्यात १० दिवस मृत्यूशी झुंज; नेपाळमधील 'त्या' इंजिनियर्सचा चमत्कारिक पुनर्जन्म

A second life : अंधार, चिखल अन् 'हरे कृष्ण'चा जप! बोगद्यात १० दिवस मृत्यूशी झुंज; नेपाळमधील 'त्या'  इंजिनियर्सचा चमत्कारिक पुनर्जन्म

नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुरानंतर एक थक्क करणारा चमत्कार समोर आला आहे. त्रिशुली-३ ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात गेल्या १० दिवसांपासून अडकलेल्या दोन कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात सैन्याला यश आले आहे. सर्व आशा संपल्याचे वाटत असतानाच मेकॅनिकल इंजिनियर संजय साह आणि कबीर महाजन या दोघांना मृत्यूच्या मुखातून बाहेर काढण्यात आले. अंधार आणि चिखलाने भरलेल्या या बोगद्यात १० दिवस अडकून पडले असताना केवळ 'हरे कृष्ण महामंत्राचा' जप करत स्वतःची जिद्द आणि जगण्याची आशा कायम ठेवल्याचे संजय साह यांनी सांगितले.

१२५० हून अधिक बळी; ९०० कामगार अजूनही अडकल्याची भीती

नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात झालेल्या ढगफुटीमुळे त्रिशुली नदीला भयानक महापूर आला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत १२५० हून अधिक लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्रिशुली नदीच्या काठावर असलेल्या सुमारे १२ जलविद्युत प्रकल्पांना या पुराचा मोठा फटका बसला असून, अजूनही ९०० हून अधिक कामगार विविध बोगद्यांमध्ये अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. लष्कर आणि बचाव पथकांकडून रात्रंदिवस शोधमोहीम सुरू असून, संजय आणि कबीर हे जीवित बाहेर आलेले पहिले सुदैवी ठरले आहेत.

लष्कराचे अथक प्रयत्न अन् सुटकेचा नाट्यमय क्षण

नेपाळ सैन्याने चिखल आणि ढिगारा बाजूला करत या दोघांना जेव्हा बाहेर काढले, तो क्षण अत्यंत भावूक होता. अंगावर चिखलाचे थर साचलेले असताना जेव्हा संजय साह बोगद्याबाहेर आले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जिवंत राहिल्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. बचाव पथकातील सैनिकांनीही संजय यांना पाहून "हा तुमचा दुसरा जन्मच आहे," अशा भावना व्यक्त केल्या.

इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतः प्राणांच्या दावणीला

नेपाळच्या सप्तरी जिल्ह्यात राहणारे संजय साह हे या जलविद्युत प्रकल्पाच्या नियंत्रण कक्षाचे (कंट्रोल रूम) प्रमुख म्हणून कार्यरत होते. पुराचे पाणी आणि चिखल जेव्हा वेगाने बोगद्यात शिरू लागला, तेव्हा तिथे ४० ते ४५ कामगार काम करत होते. एक जबाबदार वरिष्ठ अधिकारी म्हणून संजय यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सर्व सहकाऱ्यांना तातडीने सुरक्षित बाहेर पडण्याचे निर्देश दिले. इतरांचे प्राण वाचवण्याच्या या धावपळीत सगळे कामगार बाहेर पडले, मात्र दुर्दैवाने संजय साह आणि कबीर महाजन बोगद्यातच अडकून पडले. "कंट्रोल रूमचा प्रमुख या नात्याने प्रत्येकाला सुरक्षित बाहेर काढणे हे माझे पहिले कर्तव्य होते," असे संजय यांनी अत्यंत अभिमानाने नमूद केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >