Thursday, September 17, 2026

BMC License Department : फेरीवाल्यांवर कारवाई होणार कशी?

BMC License Department : फेरीवाल्यांवर कारवाई होणार कशी?

महापालिकेच्या परवाना विभागात वाहन निरीक्षकांची १२ तर कामगारांची १६६ पदे रिक्त

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या परवाना विभागाच्यावतीने अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असून या विभागांत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ फारच कमी आहे. या विभागांत वाहन निरिक्षकांची १२ पदे तर कामगारांची १६६ पदे रिक्त आहे. सध्या कामगारांची रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरून कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी महापालिकेचे कामगार आणि कंत्राटी कामगारांच्या कार्यपध्दतीत फरक असल्याने ही कारवाई दिसून येत नाही

परवाना खात्यात विभाग पातळीवर अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याकरता तसेच अनधिकृत जाहिरात फलक, पोस्टर्स, बॅनर्स, बोर्डस हटवण्यासाठी सर्व विभागात अतिक्रमण निर्मुलन वाहने पुरवण्यात येतात. विभागीय सहायक आयुक्तांच्य आदेशानुसार प्रत्येक विभागात अतिक्रमण निर्मुलन वाहने व कर्मचाऱ्यांच्याबाबतचे निर्णय वरिष्ठ निरिक्षक, परवाना (अतिक्रमण निर्मुलन) यांच्या मार्फत घेतले जातात.

मुंबई महापालिकेच्या परवाना विभागात परवाना निरीक्षकांची एकूण ५८ पदे रिक्त आहे. या परवाना विभागात एकूण २९० परवाना निरीक्षकांची पदे असून त्यातील २२० पदे भरलेली आहेत.त र ५८ पदे रिक्त आहेत. आता ही परवाना निरिक्षकांची रिक्त पदे खात्यांतर्गत परिक्षेचे आयोजन करण्यासाठी ०५ ऑगस्ट २०२६ रोजी वरिष्ठ पातळीवर सादर करण्यात आला असून त्यातून ही रिक्तपदे अंतर्गत खात्यांतर्गत भरली जाणार आहे.

फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेची एकूण २१ वाहने असून खासगी संस्थांकडून ९५ वाहने पुरवण्यात येतात. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या २६ विभागी कार्यालयांसाठी १०७ वाहन निरीक्षक आणि ३७३ कामगारांची पदे मंजूर असून त्यातील फक्त ९७ वाहन निरिक्षक आणि २०७ कामगार हे कार्यरत आहेत. तर १२ वाहन निरिक्षक आणि १६६ कामगारांची पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे कुलाबा,नरिमन पॉईट हा (ए विभाग), दादर (जी उत्तर विभाग), वांद्रे ते सांताक्रुझ पश्चिम (एच पश्चिम विभाग), विलेपार्ले ते जोगेश्वरी पश्चिम (के पश्चिम विभाग), गोरेगाव (पी दक्षिण), कांदिवली (आर दक्षिण विभाग), बोरीवली (आर मध्य विभाग), कुर्ला (एल विभाग), घाटकोपर (एन विभाग) आणि भांडुप विक्रोळी (एस विभाग)आदी विभागांत सर्वांत फेरीवाल्यांच्या प्रमुख समस्या आहेत. याच विभागांमध्ये वाहन निरीक्षक आणि कामगारांची पदे मोठ्या संख्येने कमी आहेत. त्यामुळे महापालिकेला या रिक्तपदांमुळे कारवाई करताना मोठ्या अडचणींना सामोेरे जावे लागते आणि यामुळे कारवाई शंभर टक्के केलेली दिसून येत नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >