ठाणे : उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वाढत्या तापमानानुसार पाण्याच्या पातळीत घट होत चालली आहे. अशातच ऐन उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्यांना सामोरे जावे लागू नये, यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. उद्या ठाणे भागात (Thane News) हे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यातील काही भागात २४ तासांसाठी पाणीपुरवठा (Thane Water Supply) बंद राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कटाई नाका ते ठाणे या दरम्यान आज रात्री १२ वाजल्यापासून उद्या शुक्रवारपर्यंत (दि. २५ एप्रिल, २०२५) एकूण २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. परिणामी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात, दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळून) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये, वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा, किसन नगर नं. २, नेहरू नगर तसेच माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Thane Water Supply Cutoff) तसेच, पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. या पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात
मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे पाणीपुरवठाविषयक विविध कामे हाती घण्यात येणार आहेत. ही कामे शनिवार २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासून रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपर्यंत २४ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहेत. पामुळे घाटकोपर, विद्याविहार एन आणि कुर्ला, टिळकनगर या एल विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा शनिवारी २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापासून रविवार २७ एप्रिल रोजी सकाळी १० वाजल्यापर्यंत बंद राहणार आहे.






