Thursday, September 3, 2026

Nalasopara Name Change : नालासोपाराचं नाव बदलण्याची मागणी; ‘शूरपरक’ नावासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव

Nalasopara Name Change : नालासोपाराचं नाव बदलण्याची मागणी; ‘शूरपरक’ नावासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे प्रस्ताव

मुंबई : नालासोपाराचे प्राचीन नाव ‘शूरपरक’ पुन्हा बहाल करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेने (VVCMC) यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रदेशाच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी नामांतराची मागणी करण्यात आली आहे. ( Nalasopara Name Change)

नालासोपारा हे प्राचीन काळातील ‘शूरपरक’ या बंदर शहराशी जोडले जाते. प्राकृत ग्रंथांमध्ये याचा उल्लेख ‘सुप्परका’ असा आढळतो. स्थानिक तज्ज्ञांच्या मते, ‘नालासोपारा’ हे नाव ब्रिटिश काळात रेल्वे स्थानकाला देण्यात आले आणि नाला व सोपारा या जवळच्या दोन गावांच्या नावांपासून हे नाव तयार झाले. (Vasai-Virar City Municipal Corporation)

सोमवारी VVCMC च्या स्थायी समितीच्या बैठकीत नालासोपाराच्या नामांतराच्या प्रस्तावावर चर्चा झाली. उपस्थित बहुतांश सदस्यांनी प्रस्तावाला सहमती दर्शवल्यानंतर आता राज्य सरकारकडे औपचारिक प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वसई-विरारचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले की, ऐतिहासिकदृष्ट्या हा प्रदेश ‘शूरपरक’ म्हणून ओळखला जात होता आणि त्याला समृद्ध वारसा लाभला आहे. नामांतरामुळे स्थानिकांना आपल्या ऐतिहासिक मुळांशी जोडण्यास आणि अभिमानाची भावना निर्माण करण्यास मदत होईल, असा त्यांचा दावा आहे.

रेल्वे स्थानक आणि विधानसभा मतदारसंघाचेही नामांतर?

भाजप नेते मनोज पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा मुद्दा राज्य सरकारमार्फत केंद्राकडे मांडण्याची मागणी केली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘शूरपरक रेल्वे स्थानक’ करण्याची मागणी करण्यात आली आहे. (Devendra Fadnavis)

याशिवाय विधानसभा मतदारसंघाचे नाव ‘शूरपरक’ करण्याची तसेच रेल्वे आणि पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘शूरपरक जनजागृती मोहीम’ सुरू करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

नाव बदलल्याने वारसा परत मिळेल का?

नालासोपारा परिसराला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला असल्याचे इतिहासकार आणि तज्ज्ञ सांगतात.

">वैतरणा नदी आणि वसईच्या खाडीतून येणाऱ्या जहाजांसाठी हा परिसर पूर्वी महत्त्वाचे बंदर आणि व्यापारी केंद्र होता. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे या ऐतिहासिक बंदराचे स्वरूप नष्ट झाले आहे.

वास्तुकलेचे प्राध्यापक अनिरुद्ध पॉल यांच्या मते, नालासोपाराचा इतिहास समृद्ध असला तरी केवळ नाव बदलल्याने त्याचा हरवलेला वारसा किंवा वैभव परत मिळणार नाही. त्यासाठी ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन आणि विकासही आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

इतिहासकारांच्या मते, नालासोपारा परिसरातील वस्ती आणि व्यापारी केंद्राचा इतिहास 2000 वर्षांहून अधिक जुना आहे. पुराणांमध्ये शूरपरकचा भौगोलिक संदर्भही आढळतो. या परिसरात अशोककालीन स्तूपांचे अवशेष आणि शिलालेख सापडले आहेत. त्यामुळे नालासोपाराच्या प्राचीन इतिहासाला पुन्हा उजाळा देण्याच्या प्रयत्नांना महत्त्व प्राप्त झाले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >